'कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न'

'कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न'
'कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न'

नागपूर  ः शेतकरी कर्जमाफीच्या दृष्टीने राज्य सरकारस्तरावर सर्व बाजूंनी माहिती घेतली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात खरिपापूर्वी पूर्ण करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले. 

हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार पत्रकारांशी शुक्रवारी (ता.२०) बोलत होते.  श्री. पवार म्हणाले, की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकारच्यापातळीवर चर्चा सुरू आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतानाच्या काळात देशात मोठी कर्जमाफी करण्यात आली होती. शरद पवार स्वतः याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. अर्थमंत्री जयंत पाटील देखील माहिती घेत आहेत. शेजारील राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांतही कर्जमाफी झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला त्याची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थ, सहकार आणि कृषी विभागाकडून आवश्यक ती माहिती संकलित केली जात आहे. प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, ही शासनाची मानसिकता आहे. त्यासोबतच या योजनेत पारदर्शकता राहावी याचीही दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी देताना आधार कार्ड लिंक करून कर्जमाफी देता येईल का याबाबतसुद्धा चाचपणी सुरू असल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.  

ही कर्जमाफी दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न राहतील, त्यासाठी तीन वर्षे लागणार नाहीत, असा टोलाही त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारला लगावला.  कर्जमाफीसाठी किती निधी लागणार आहे, त्याचा किती आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल, तिजोरीला किती भार पेलणे शक्य आहे, याचाही विचार सुरू आहे. कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा संपूर्ण बोजा राज्याच्या तिजोरीवरच पडणार आहे, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.  दरम्यान,  अधिवेशनानंतर दोन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळात ४३ मंत्रिपदे आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com