चिकन विक्रीची दुकाने उघडी ठेवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामीण भागातदेखील जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका पातळीवरदेखील यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश देण्यात आले आहेत. - अजित पवार, उपमुख्यमंत्री.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे  : कोरोना विषाणूची साथ नियंत्रण उपायांसाठी आम्ही अजून काही निर्णय जरूर घेऊ. त्यामुळे जनतेची थोडी गैरसोय होईल. मात्र, अत्यावश्यक वस्तू विक्री बंद केली जाणार नाही, तसेच चिकन विक्रीची दुकाने उघडी ठेवली जातील,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या `कोविड-१९’  रोगाची साथ नियंत्रित करण्यासाठी चालू असलेल्या नियोजनाचा आढावा श्री. पवार यांनी शुक्रवारी (ता.२०) घेतला. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना स्थितीबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री सातत्याने जनतेला काळजी घेण्याबाबत जागृतीचे तसेच उपाययोजनांचे चांगले काम करीत आहेत. अर्थात, कोरोनाबाधित व्यक्तींची आता संख्या ५२ झाली आहे. त्यामुळे गर्दी टाळावीच लागेल. मी आज पुण्याचा आढावा घेतला. येथे सर्व निर्णय योग्य पद्धतीने घेतले जात आहेत. कोरोनाबाबतीत आम्ही विविध उपायांबाबत ३१ पर्यंत मुदत असलेले आदेश काढले होते; पण आता पुढील सूचना निघेपर्यंत सदर उपाय सुरू राहतील,” असे श्री. पवार म्हणाले.

शहरी किंवा ग्रामीण भागात लग्न सोहळे अजूनही होत आहेत. असे सोहळे शक्यतो टाळावेत. अगदीच गरज असेल तर २५ जण जमू शकतात. तसेच दशक्रिया किंवा अंत्यसंस्कार समयी वेळी गर्दी टाळणे समाजाच्या हिताचे राहील. सरकारी आदेश ‘लाईटली’ कोणी घेऊ नये. पण घाबरूदेखील नका. राज्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, पण काही जण बरेदेखील झाले आहेत, असेही श्री. पवार म्हणाले.

गरज पडली तरच बससेवा सुरू असावी, असे प्रशासनाचे मत आहे. बसेस सुरू आहेत; कारण अत्यावश्यक सेवा देणारा वर्ग सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करीत असतो. म्हणून काही ठिकाणी बस सुरू आहेत. पण गर्दी टाळली नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड भागात अजून वेगळे निर्णय घेतले जातील. सरकारी कामे २५ टक्के कर्मचारी वर्गात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लवकरच पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. राज्याने केंद्राकडे काही निधी मागितलेला नाही. उपायांसाठी राज्य सक्षम आहे. मार्चएन्ड कामांबाबत विशेषतः निधी परत जाऊ नये म्हणून आम्ही वेगळे धोरण निश्चित केल्यास तसे जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले.  औद्योगिक कंपन्या बंद करण्याबाबत काय भूमिका घेणार असे विचारले असता श्री. पवार म्हणाले की, आर्थिक नुकसान महत्त्वाचे की माणसाचं आरोग्य महत्त्वाचे आहे हे पाहिले पाहिजे. खरे तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले असून औद्योगिक क्षेत्रात फक्त महत्त्वाचे उत्पादन करावे लागेल. आम्ही अत्यावश्यक उत्पादनांसाठी मान्यता दिली  आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com