मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी १८० उमेदवारी अर्ज पात्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १८० उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. गुरुवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यात ८३ उमेदवारी अर्ज बाद झाले. 

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला या बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. सहकार विभागाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २९ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी प्रतिनिधी या समितीच्या संचालक मंडळावर निवडून येणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी मुंबईमधून अर्थात तुर्भे येथील एपीएमसी बाजारातून सहा संचालक निवडून जाणार आहेत. यात कांदा, बटाटा, लसूण, भाजी, फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक संचालक राहणार असून या बाजारात गेली अनेक वर्षे काम करणारे माथाडी, हमाल, कामगारांमधून एक संचालक निवडला जाणार आहे.

या पाचही बाजारांवर महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचे वर्चस्व आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील या दोन नेत्यांचे या संघटनेवर प्राबल्य आहे. राजकीय लपंडावामुळे या दोन नेत्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. 

सध्या एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २४ ते २९ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत एकूण २६३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यात १८० उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित ८३ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत. येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

१५ फेब्रुवारीला चिन्हांचे वाटप व त्यानंतर २९ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची २ मार्चला मतमोजणी होणार आहे.  सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी संचालक म्हणून निवडून येणार असून यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हा नेते या निवडणुकीत उतरले आहेत. पाच संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत. पुढील महिनाभर या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 

शशिकांत शिंदे, पानसरे यांची बिनविरोध निवड दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री व कोरेगाव मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माथाडी नेते शशिकांत शिंदे कामगार प्रतिनिधींमधून संचालक मंडळासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या प्रवर्गातून शिंदे यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. शिंदे यापूर्वी तीन वेळा समितीचे संचालक राहिलेले आहेत, मात्र तोपर्यंत ते राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले नव्हते. आता मात्र त्यांनी पुन्हा संचालकपदासाठी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फळ बाजारातून संजय पानसरे यांना एकमताने पाठिंबा दिला गेल्याने त्यांची निवडही बिनविरोध झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com