अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार हजार कोटी वितरित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी पाऊस आणि जुलैनंतरच्या महापूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने अनुक्रमे ४,५०० कोटी आणि ३८९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. अवकाळीबाधित आणि महापूरग्रस्तांसाठी देण्यात आलेली ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली जाणार असून, त्यातून कोणतीही वसुली करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. 

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस झाला. याचा राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. पंचनाम्यानुसार सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 

राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी १६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. खरिपातील शेती-पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता हेक्टरी आठ हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजारांची मदत जाहीर करण्यात आली. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यापोटी राज्यपालांनी २ हजार ५९ कोटींचा पहिला हप्ता जाहीर केला. त्यानंतर २३ नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी २५ नोव्हेंबरला अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात ५३८० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

राज्याच्या आपत्कालीन निधीमधून ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने आर्थिक तरतुदीअभावी मदत वितरण रखडले होते. 

दरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करुन ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता निधीची तरतूद झाल्याने मदत आणि पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयांना दुसऱ्या टप्प्यात ४५०० कोटी वितरित केले आहेत. 

शेतीपिके आणि बहुवार्षिक फळपिकांच्या बाबतीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी ही मदत दिली जाणार आहे. शेतीपिकांच्या बाबतीत किमान मदत १,००० रुपये आणि फळपिकांच्या बाबतीत २,००० रुपये असावी असे निर्देश देण्यात आले आहेत.    महापूरग्रस्तांसाठी ३८९ कोटींची मदत २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले. अशा भागातील ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतलेले नाही; पण त्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत एसडीआरएफ आणि एनडीआरएफमधून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या तिप्पट दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुणे विभागाकरिता ३८९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com