सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी केले वजा !

‘कोरोना’मुळे आर्थिक कोंडी वाढली आहे. या परिस्थितीत विमा हा दिलासादायी ठरला असता. पण कर्जात वजा केल्यामुळे काहीच दिलासा मिळालेला नाही. बँक प्रशासनाने विमा, नवीन कर्ज, सातबारा उतारे याबाबत भूमिका स्पष्ट करावी. - प्रकाश गायकवाड, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब उत्पादकाच्या खात्यावर डाळिंबाचा हेक्‍टरी ३८,५०० रुपयांप्रमाणे विमा जमा झाला. मात्र, याच दिवशी बँकेने विमा रक्कम शेतकऱ्याच्या परस्पर कर्जापोटी वजा करून घेतली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकेने परस्पर पैसे घेऊन अधिकच अडचणीत आणल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील आठ हजारांवर डाळिंब उत्पादकांच्या खात्यावर हेक्टरी ३८,५०० रुपयांप्रमाणे दोन दिवसांपूर्वी विमा कंपनीने पैसे जमा केले. मात्र याच दिवशी बँकेने शेतकऱ्यांच्या परस्पर हे पैसे वजा करून घेतले. यावर विमा फॉर्ममध्ये कर्जाला पैसे वर्ग करण्यास हरकत नसल्याची सहमती दिलेली असते असे बँकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. काही शेतकऱ्यांनी महा-ई-सेवातून विमा भरला होता. त्यांचीही रक्कम वजा केली गेली आहे.

रिझर्व्ह बँकेने कर्ज वसुलीला स्थगितीच्या सूचना आणि राज्य सरकारचे आदेश असताना संचारबंदी आणि आर्थिक कोंडीत असताना बँकेने शेतकऱ्यांच्या परस्पर सक्तीने वसुली केली आहे. पीक कर्जाची मुदत ३१ मार्च आहे. त्या वसुलीसाठी बँकांची धडपड चालली आहे. कोरोना साथीमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. साहजिकच बँकेची वसूली थंडावली आहे. त्यामुळे असे प्रकार होत आहेत.

कर्ज वसुलीला मुदत वाढ मिळणार? बँक आरबीआय आणि शासनाच्या आदेशाचे पालन करणार का ? पैसे भरल्यास नवीन पीक कर्ज तातडीने देणार का? यासाठी उताऱ्याची सक्ती केली जाणार का? केली तर उतारे सहज मिळतील का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. केवळ विमा वजा केल्याने शेतकरी कर्जमुक्त होत नाही. त्यामुळे विमा वजा करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसरीकडे बँक प्रशासन जे शेतकरी पैसे भरतील त्यांना तातडीने नवीन पीक कर्ज सातबारा उतारे आणि पीक बघून देऊ, तसेच सक्तीची वसुली केलेली नाही असे सांगत आहे. यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. 

याबाबत पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने नवीन कर्ज देऊ. दुसऱ्या टप्प्यात विमा वजा करून घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज देऊ. मात्र तो गेल्या वर्षीचा मध्यम मुदत कर्जाचा थकबाकीदार नसावा. शेतकऱ्यांनी सबुरीने घ्यावे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तालुका निरीक्षक मनोहर साळुंखे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com