खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत नसली तरी कोरडा ज्वारी आणि मक्‍याचा कडबा किंवा चारा उपलब्ध नाही. दर्जेदार ज्वारी, मक्‍याच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत आहेत. सध्या आगाप ज्वारीची काढणी काही भागांत सुरू झाली आहे. कडबा अजूनही हवा तसा उपलब्ध नाही. यंदा ज्वारी, दादरची पेरणी अधिक झालेली असली तरी या कडब्याला चांगला उठाव राहील, अशी स्थिती आहे. 

अनेक भागांत चाराटंचाई आहे. पारोळा, चाळीसगाव, अमळनेर भागांत दूध उत्पादकांची संख्या अधिक आहे. या भागातील दूध उत्पादकांना महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे. पण तो कुठेही उपलब्धच नसल्याने प्रशासनाने अद्याप चारा वाहतूक व इतर बाबींवर बंदी आणलेली नाही. सध्या पूर्वहंगामी कापूस पिकातील वरचे शेंडे, बांधावरील गवतासह केळी पिकातील फुटवे, घड काढणी झालेल्या झाडाची हिरवी पाने चारा म्हणून शेतकरी उपयोगात आणत आहेत. चाऱ्यासाठी दुधाळ पशुधन पालकांना वणवण फिरावे लागत आहे. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, त्या शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी संकरित तसेच अन्य प्रकारच्या गवताची लागवड केली आहे. यातून चारा उपलब्ध होत असल्याने दुधाळ पशुधनासमोरील चाऱ्याची अडचण काहीशी दूर होत आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ लाख पशुधन आहे. त्यांच्यासाठी चारा मुबलक असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. परंतु यंदा कोरडा चारा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. सोयाबीन, ज्वारी, मका मळणीनंतर मिळणारा भुसा, उडीद, मूग काढणीनंतर उपलब्ध होणारी काड व कडबा कुठेही उपलब्ध होत नसल्याचे पशुधनपालकांचे म्हणणे आहे. जो चारा अतिपावसात हाती आला आहे, तो काळवंडला आहे. तो रोज उन्हात वाळविण्याची वेळ आली आहे. सध्या वातावरण थंड व अधिक आर्द्रतेचे असल्याने कोरड्या चाऱ्याचा दर्जा राखताना अडचणीदेखील येत आहेत.

यंदा जादा झालेल्या व शेवटच्या कालावधीतील पावसामुळे ज्वारीचा कडबा, मका व बाजरीचा चारा पूर्णपणे खराब झाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत जनावरे शेतातील बांधावर चारली जात होती. मात्र आता बांधावरील गवत संपत आले आहे. त्यामुळे जनावरे कोठे चारावित असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतकरी ज्वारीची पेरणी करत आहेत. मात्र रब्बीतील ज्वारीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.   मध्य प्रदेश, गुजरातमध्येही तुटवडा खानदेशात कोरड्या चाऱ्याची जशी अडचण आहे, तशीच समस्या नजीकच्या मध्य प्रदेश, गुजरातमध्येही आहे. तेथील शेतकरी चाऱ्यासाठी खानदेशात येत आहे, परंतु त्यांनाही कोरडा चारा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर, गुजरातमधील तापी, बारडोली भागातही उसाच्या माध्यमातून चाऱ्याची समस्या दूर केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com