शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार

मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये दराने शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.७) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये दराने शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.७) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सध्या जिल्हा मुख्यालयी शिवभोजन केंद्रे चालविली जातात. आता ती तालुकास्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर ५ रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीचा शहरी भागात ५० रुपये तर ग्रामीण भागात ३५ रुपये प्रतिथाळी असा दर आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपये रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रतिथाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रतिथाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल.

ही भोजनालये सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात सुरु राहतील. या केंद्र चालकांना देखील ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यातून या बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे आहे तिथे प्राधान्याने करण्यात येईल असे सांगितले.

होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. मंगळवारनंतर (ता.१४) लॉकडाउन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com