पुण्यातील लॉकडाउनमुळे  साताऱ्यातील शेतकरी अडचणीत 

साताऱ्यातील ७० ते ७५ टक्के शेतीमाल या शहरांमध्ये विक्रीसाठी जात असतो. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे शहरात लॅाकडाउन सुरू झाल्याने साताऱ्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोपर्डे येथील हेमंत मोहिते यांचे पावटा व वांगे पीक विक्रीसाठी तयार आहे, मात्र लाॅकडाउनमुळे माल पाठवण्यात अडचणी आहेत
कोपर्डे येथील हेमंत मोहिते यांचे पावटा व वांगे पीक विक्रीसाठी तयार आहे, मात्र लाॅकडाउनमुळे माल पाठवण्यात अडचणी आहेत

सातारा  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीच्या दृष्टीने मुंबई व पुणे येथील बाजार समित्या महत्त्वाच्या आहेत. साताऱ्यातील ७० ते ७५ टक्के शेतीमाल या शहरांमध्ये विक्रीसाठी जात असतो. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे शहरात लॅाकडाउन सुरू झाल्याने साताऱ्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. उपलब्ध सर्व शेतीमालाची स्थानिक बाजारात विक्री होणे शक्य नसून शेतीमाल फेकून द्यावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे गत तीन महिन्यांत कोट्यवधींचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. यातून बाहेर पडत असतानाच पुन्हा पुणे शहरात लॅाकडाउन सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील ७० ते ७५ टक्के शेतीमाल हा पुणे व मुंबई शहरात जातो. मुंबई मार्केटमध्ये सुरू झाले असले तरी अजूनही कोरोनाच्या भीतीने मोठे व्यापारी, अडते, हमाल बाजारसमितीत येत नसून, येथे शेतीमालाची कवडीमोल दराने खरेदी विक्री केली जात आहे. त्यामुळे येथे शेतकरी कमी प्रमाणात शेतीमाल पाठवला आहे.

सध्या सर्वाधिक शेतीमाल पुणे बाजार समितीत जात होता. मात्र सोमवारपासून पुण्यात लॅाकाडाउन सुरू केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. उत्पादित भाजीपाला, फळे कशी आणि कुठे विकावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. लॅाकडाउनमुळे जिल्ह्यातील फुलशेती अगोदरच कोलमडली असतानाच आता भाजीपाला शेती कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करावीच मात्र, त्याबरोबर शेतीमाल विक्रीसाठी देखील स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  प्रतिक्रिया.. ‘कोराना’चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र या उपाययोजनांमुळे शेतकरी भरडला जातोय हे देखील लक्षात घ्यावे. सातारा जिल्ह्यात दररोज शेकडो टन शेतीमाल तयार होतो, तो कुठे विकायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतीमाल विक्रीसाठी उपाययोजना कराव्यात.  -मनोहर साळुंखे, कृषिभूषण शेतकरी, नागठाणे, जि. सातारा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com