सावकारी कर्जातूनही मुक्ती; राज्य सरकारकडून ६५ कोटी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने लागू केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमबजावणी यशस्वीपणे सुरू असतानाच आता विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारी कर्जाचे ओझे असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधित सावकाराने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आल्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील खासगी सावकारी सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. विदर्भातील आमदार दिलीप सानंदा प्रकरणात तर न्यायालयाने राज्य सरकारलाच दंड ठोठावला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे खासगी सावकारीचा विळखा हेच प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतकरी आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश सर्व समित्यांनीसुद्धा हा निष्कर्ष नोंदवला आहे. 

शेतकऱ्यांना खरीप पेरणीवेळी मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. सततची नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाच्या दरातील अनिश्चितता आदींमुळे शेतकऱ्यांना आधीची कर्जे फेडता येत नाहीत. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्यात अडचण येते. राज्य सरकारने जिल्हा, ग्रामीण आणि व्यापारी बॅंकांना बंधने घालूनही आवश्‍यक प्रमाणात वित्तपुरवठा होत नाही. त्या पार्श्वभूमीवर खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही.

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ आता परवानाधारक खासगी सावकारांच्या कर्जातूनही विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक खासगी सावकाराकडून पीककर्ज घेतले असेल तर त्याची रक्कम राज्य सरकार संबंधित सावकारांना अदा करणार आहे. त्यासाठी २०१९-२०२० या आर्थिक वर्षात सरकारने ६५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या दोन विभागातील ३८ हजार शेतकऱ्यांचे ३७ कोटी रुपयांचे परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज थकीत असल्याचे सांगितले जाते, हे सर्व कर्ज राज्य सरकार माफ करणार असून, तेवढी रक्कम सावकारांना देऊन शेतकऱ्यांची या खासगी सावकारी कर्जातून सुटका केली जाणार आहे. 

याआधीच्या शासन निर्णयानुसार खासगी सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे या कर्जमाफीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करून ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे. त्या शेतकऱ्यांची कर्जेसुद्धा माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.  

व्याजदर केवळ कागदोपत्रीच राज्यात आजघडीला ११,२०० नोंदणीकृत खासगी सावकार कार्यरत आहेत. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच सावकारांनी वित्तपुरवठा आणि व्याज आकारणी करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना तारण असेल तर वार्षिक नऊ टक्के व विनातारण वार्षिक ११ टक्के व्याज आकारावे आणि बिगर शेतकऱ्यांना अनुक्रमे वार्षिक १५ व १८ टक्के व्याज आकारावे, असा नियम आहे. मात्र, सरकारने ठरवून दिलेला व्याजदर केवळ कागदोपत्रीच दाखवला जातो, प्रत्यक्षात कितीतरी पटीने जास्त व्याज आकारले जाते. महिन्याला तीन टक्के ते गरजेनुसार कमाल पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत व्याज आकारले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com