खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके उभीच

जळगाव ः पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण राहिलेले पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. यातच अलीकडेच प्रशासनाने सर्वच पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश  जारी केले आहेत. पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली ज्वारी, सोयाबीन, वेचणीवरील कापूस आदी पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. 

उडीद, मुगाचे पंचनामे अपूर्ण असतानाच पाऊस सुरू झाला. महसूल व कृषी यंत्रणेने काम थांबविले. बुधवारपूर्वी (ता.२३) जोरदार पाऊस सुरूच होता. यादरम्यान ज्वारी, सोयाबीन, बाजरी, पूर्वहंगामी कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी सुरू झाली. अशातच या पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यात पालकमंत्री व प्रशासनाने दिले. यानंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पंचनामे सुरू झाले. त्यासंबंधी प्रशासनाने माहितीदेखील जारी केली.

परंतु, अनेक भागांत तलाठी, कृषी सहायक पोचलेले नाहीत. कामांचा अतिरिक्त भार, रिक्त पदे आदी सबबी प्रशासन देत आहे. परंतु, पंचनामे होण्यापूर्वीच पिकांची मळणी, कापणी किंवा पीक मोडून पूर्वमशागत केली तर पंचनामा होणार नाही, आपल्याला मदत मिळणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांची कापणी, मळणी सुरू केलेली नाही. पिके तशीच उभी आहेत.

गेले चार दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे वातावरण खानदेशात अनेक भागात आहे. अधूनमधून काळे ढग जमा होतात. पण पाऊस कोसळत नसल्याने तेवढा दिलासा मिळत आहे. अशा स्थितीत पंचनामे तातडीने उरकून नुकसानीची नेमकी टक्केवारी, वस्तुस्थितीचा अहवाल प्रशासनाने तयार करावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

यंदा अतिपावसात पिके हातची गेली. त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळायला हवी. त्यासाठी पंचनामे या आठवड्यात पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

प्रतिक्रिया पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. कारण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्यांअभावी शेतात पिके तशीच उभी आहेत. कृषी सहायक, तलाठी मंडळी गावाकडे फिरकत नाही. पंचनामे वस्तुस्थितीनुसार झाले पाहिजेत.  - विश्राम पाटील, शेतकरी, पारोळा, जि.जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com