नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच

नगर ः सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले. आठ दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अजूनही पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पावसामुळे सोयीबीनचे झालेले नुकसान
पावसामुळे सोयीबीनचे झालेले नुकसान

नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले. आठ दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांत तातडीने पंचनाम्याची माहिती द्यावी, असे कृषी विभागाने कळवले आहे. मात्र अजूनही पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

नगर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने खरिपाची पिके जोमात आली. शेतकरी समाधानी होते. मात्र गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस सुरु असल्याने जोमात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. कापूस, काढणीला आलेली व काढणी केलेली बाजरी, सोयाबीन, मका, भूईमुगाचे मोठे नुकसान झाले. तुरीलाही फटका बसला. कांदा, भाजीपाला जागेवर सडला. निचरा होत नसलेल्या शेतात पाणी साठवून राहिले आहे. पाऊस थांबून चार दिवस झाले तरी अजूनही अनेक ठिकाणी शेतांत पाणी साचलेले आहे. कापूस, बाजरी, भूईमुगाचे अनेक भागांत ८० टक्के नुकसान झाले आहे.  

पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याचे आठ दिवसांपुर्वीच सांगितले गेले होते. मात्र अजूनही नुकसान झालेल्या ५० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात कृषी व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी पंचनाम्यासाठी पोचलेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने अनेक तालुक्यांत पंचनामे झालेच नाहीत. आता दोन दिवसांपुर्वी आदेश दिल्याची माहिती आहे. दोन दिवसांत नुकसानीची माहिती कृषी विभागाने मागितली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी प्रा. जयहिंद खेडकर यांनी केली आहे.    

खरिपाची पेरणी झाल्यानंतर निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने बियाणे उगवले नाही आणि अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. बियाणे उगवले नसल्याची तक्रार झाल्यावर संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तालुकास्तरीय समितीने पंचनामे केल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याचा नियम. मात्र वाट पाहून दुबार पेरणी केल्यावरही पंचनाम्याला कृषी विभागाचे अधिकारी पोचले नव्हते. आताही पाऊस सुरु आहे. कापूस वेचणीला सुरवात झाली आहे. वेळेत पंचनामे झाले नाही तर नुकसान कसं ग्राह्य धरणार, त्यामुळे यावेळीही ‘बैल गेला...’ अशी स्थिती होणार नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

प्रतिक्रिया यंदा सततच्या पावसाने कापूस, सोयाबीनचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. पंचनामे करत असल्याचे कृषी विभाग सांगत असला तरी अजून तरी आमच्या शेतात कोणीही पोचलेले नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत मिळणे गरजेचे आहे.  - दिपाली नवगिरे, शेतकरी, पानेगाव, ता. नेवासा, जि, नगर. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com