चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून वाढत्या नैराश्‍यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. या वर्षी नोव्हेंबरअखेर ५० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यातील केवळ १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली, दोन प्रकरणे प्रलंबित, तर २१ प्रकरणांची अद्यापही चौकशी सुरू आहे. 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कपाशी, धान, सोयाबीन असा मिश्र पीक पॅटर्न आहे. सरासरी पाऊसमान चांगले असले, तरी सिंचनाच्या मर्यादित सुविधा असल्याने बहुतांश भागात पिके कोरडवाहूच घेतली जातात. निसर्गाच्या भरवशावर असलेल्या या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यातूनच अपेक्षित पीक उत्पादन मिळत नसल्याने कर्जाची परतफेड व कुटुंबांच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते.

परिणामी, वाढत्या नैराश्‍यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढत आहेत. जिल्ह्यात २००१ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सुमारे ८०८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५३४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. २१ प्रकरणांची फेरचौकशी सुरू असून, २४१ प्रकरणे जिल्हा समितीने फेटाळली आहेत. अपात्र प्रकरणे शेतकरी आत्महत्या म्हणून सिद्ध होण्यासाठी आपदग्रस्त कुटुंब पुरावा सादर करू शकले नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

२०१८ मध्ये ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ३६ प्रकरणे पात्र ठरली. १९ प्रकरणे फेटाळण्यात आली. एक प्रकरण अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहे. शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी अनेक उपाय केल्याचा दावा प्रशासकीय पातळीवरुन केला जात आहे. परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे वास्तव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com