शेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार दाखल  

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल नियमनमुक्ती कायद्याचा आधार घेत झालेल्या व्यवहारात फसवणुकीचे देशातील पहिले प्रकरण समोर आले आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची तब्बल तीन लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल नियमनमुक्ती कायद्याचा आधार घेत झालेल्या व्यवहारात फसवणुकीचे देशातील पहिले प्रकरण समोर आले आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची तब्बल तीन लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी ६ आॅक्टोबरला पुढील सुनावणी होईल. 

‘एक देश-एक बाजार’ या धोरणांतर्गत केंद्र सरकारने मुक्त व्यापार धोरणाला परवानगी दिली आहे. या अंतर्गत पॅनकार्डधारक व्यक्तीला थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतीमालाची खरेदी करता येईल. यातून स्पर्धा वाढत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला वाढीव दर मिळतील अशी अपेक्षा केंद्र सरकारला आहे. लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी देखील या विधेयकावर स्वाक्षरी केली. मात्र यातून फसवणूक वाढेल असे सांगत काही संघटनांनी याला विरोध तर बाजार स्वातंत्र्य मिळेल असे सांगत काही संघटनांनी याचे समर्थन केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर फसवणुकीची पहिली तक्रार दाखल झाली आहे.  महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याकडून मका खरेदी करीत मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने शेतीमालाचे तीन लाख रुपये देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

जितेंद्र कत्थू भोई (भटाणे, शिरपूर, धुळे) या शेतकऱ्याकडून सुभाष बाबूलाल वाणी (खेतिया, पानसेमल, बडवानी, मध्यप्रदेश) या व्यापाऱ्याने त्यांच्या गावात येत मका खरेदी केला होता. २७० क्विंटल ९५ किलो मका १२४० रुपये दराने या व्यापाऱ्याने घेतला. या मक्याची किंमत तीन लाख ३२ हजार ६१७ रुपये होते. कच्ची पावती आणि चुकाऱ्यापोटी बँक ऑफ इंडिया खेटिया शाखेचा धनादेश व्यापाऱ्याने जितेंद्र भोई यांना दिला. मात्र पैशाअभावी तो वटलाच नाही. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी केली तर पैसे देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होत आहे.    सहा ऑक्टोबरला होणार सुनावणी शेती उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सरळीकरण) अध्यादेश नियम २०२० मधील नियमानुसार अशा प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. जितेंद्र भोई यांनी त्यानुसार, मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्या अंतर्गत पानसेमल येथील उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात २९ सप्टेंबरला खटला दाखल केला आहे. यावर मंगळवारी (ता.६) पुढील सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया सुभाष व त्याचा भाऊ अरुण वाणी हे दोन व्यापारी मध्य प्रदेशातील आहेत. आमच्या भागात गेल्या हंगामात त्यांनी कापूस, भुईमूग खरेदी केला होता. या माध्यमातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. आता मात्र अनेक शेतकऱ्यांचे पैसे देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे.  त्यामुळे नव्या कायद्यानुसार त्यांच्याविरोधात दाद मागितली आहे. - जितेंद्र भोई, शेतकरी, भटाणे, जि. धुळे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com