सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेचे १६९ कोटी शिल्लक

चांदा ते बांदा ही योजना शेतकरी, महिला, कष्टकरी आणि मच्छिमारांच्या विकासासाठी होती. योजना बंद करू नये अशा प्रकारचे निवेदन मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. जिल्ह्याचा हा विकास निधी कोणत्याही स्थितीत परत जाऊ देणार नाही प्रसंगी आमदारकीपणाला लावेल. — दीपक केसरकर, माजी पालकमंत्री तथा आमदार
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग  ः सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी मागील सरकारने सुरू केलेल्या चांदा ते बांदा योजनेचा सिंधुदुर्गाकरिता आलेल्या निधीपैकी तब्बल १६९ कोटींचा निधी अखर्चित आहे. त्यातच ही योजना आता बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही योजना बंद झाल्यास जिल्ह्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी मागील सरकारने चांदा ते बांदा योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून शेती, शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याचा उद्देश होता. जिल्ह्यातील शेतकरी गट, महिला बचत गटांना ७५ टक्के अनुदानाच्या अनेक योजना यात समाविष्ट होत्या. ही योजना २०१७ मध्ये आखण्यात आली. २०१७- २०१८ मध्ये प्रत्यक्ष योजना अंमलबजावणीला सुरुवात झाली. पहिल्या वर्षात या योजनेतर्गंत ६७ कोटी निधी प्राप्त झाला. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ७२ कोटी ५७ लाख १९ हजार रुपये निधी आला. २०१९-२० साठी ५४ कोटी ३९ लाख ३५ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला. तीन वर्षांत १९३ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला.

ही योजना राबविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे सुरुवातीला या योजनेसाठी प्रस्ताव कमी आले. शेतकरी गट, महिला बचत गटांना ७५ टक्के अनुदान आणि योजनेची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांकडून या योजनेसाठीच्या प्रस्तावात वाढ झाली. सुरुवातीची दोन वर्ष अतिशय संथपणे अंमलबजावणी झाल्यामुळे या योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी फक्त २५ कोटीच निधी खर्च झाला आहे.

जिल्हा प्रशासनाकडे या योजनेसाठीचा १६८ कोटी ९५ लाख ९३ हजार रुपये निधी अखर्चित आहे. त्यातच आता ही योजना नवे सरकार बंद करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.त्यामुळे या योजनेतर्गंत प्रस्ताव दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ही योजना बंद झाली शिल्लक निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  या योजनेतून अनेक प्रकल्प सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ परिसरात सुरू करण्यात आले आहे. ही योजना बंद झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, महिला बचत गटांचे नुकसान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com