परमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर होतोय परिणाम

फळबाग लागवडीसाठी पूर्वी सरकारमान्य खासगी रोपवाटिकांतून रोपे घेण्यासाठी आधी परमीट दिले जायचे. यंदा ते बंद केले आहे. गेल्यावर्षीचा दुष्काळ आणि आर्थिक टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची इच्छा असूनही अगोदर रोपे खरेदी करायला अडचणी येत आहेत. - विजयकुमार पालवे, रोपवाटिका चालक, पालवेवाडी, ता. पाथर्डी.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. कृषी विभागाकडून खासगी सरकारमान्य रोपवाटिकांतून रोपे घेण्यासाठी परमीट मिळायचे. यंदा हे परमीट देणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगोदर स्वखर्चाने सरकारमान्य रोपवाटिकांतून रोपे खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी इच्छा असली तरी फळबाग लागवड करू शकत नसल्याने यंदा फळबाग लागवडीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. यंदा फळबाग लागवडीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी मोजक्याच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष फळबाग लागवड केली आहे.

शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यासाठी कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (नरेगा) फळबाग लागवड योजनेचा लाभ दिला जातो. पूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) फळबाग लागवड योजनेचा लाभ घेताना पाच एकरांच्या आतील अल्पभूधारक शेतकरी असल्याची अट आहे. त्यामुळे पाच एकरांवरील शेतकरी योजनापासून वंचित राहत असल्याने गेल्यावर्षीपासून भाऊसाहेब  फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली.

गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने ३३२ हेक्टर क्षेत्रावर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून तर नरेगामधून ३१० हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती. गेल्यावर्षीच्या दुष्काळाने अनेक वर्षे जगवलेल्या बागा जळाल्या आहेत. त्यामुळे यंदा फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ होईल असा अंदाज बांधून फळबाग लागवडीसाठी १० कोटी ७१ लाखांचे उद्दिष्ट दिले गेले. यंदा फळबाग लागवडीसाठी ७११० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, आतापर्यत भाऊसाहेब  फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ३५७ हेक्टर तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) मधून ३७७ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली गेली आहे.

जिल्ह्यात ३१ शासनमान्य तर ५ ठिकाणी कृषी विभागाच्या रोपवाटिका आहेत. फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभाग रोपे खरेदी करण्यासाठी परमीट देत असत. रोपे खरेदी केल्यावर कृषी विभाग थेट रोपवाटिकांना रक्कम जमा करत. यंदा मात्र कृषी विभागाने परमीट देणे बंद केले असून स्वखर्चाने रोपे खरेदी करावीत असे सांगितले जात आहे. त्याचा फळबाग लागवडीवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी अगोदर स्वखर्चाने रोपे खरेदी करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने मात्र फळबाग लागवडीवर काहीही परिणाम झालेला नाही. वर्षाअखेर उद्दिष्ट पूर्ण होईल असे सांगितले आहे. कृषी विभागाने सरकारमान्य खासगी रोपवाटिकांतून रोपे घेण्यासाठी परमीट देणे बंद केले असले तरी शेतकरी स्वतः रोपे खरेदी करतात. फळबाग लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसत नाही, असे कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com