टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला फटका

जयपूर, राजस्थान ः राज्यातील २० जिल्ह्यांतील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

श्री गंगानगर, नागौर, जयपूर, दौसा, कारुली, सवाई माधोपूर भागात नियंत्रणात्मक उपाययोजना केल्यानंतर टोळांच्या झुंडी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशाकडे सरकल्या आहेत. टोळधाडीमुळे श्री गंगानगरमधील ४ हजार तर नागौर जिल्ह्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी दिली.

सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोळधाड प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आल्या. टोळधाडीच्या झुंडी १५ ते २० किलोमीटर प्रतितास वेगाने दिवसभरात १५० किलोमीटर प्रवास करतात. सध्या शेतांमध्ये पिके नसल्याने टोळधाडीने झाडे आणि भाजीपाल्यास आपले लक्ष्य केले आहे. सध्या शेतांमध्ये पिके नसल्याने टोळधाड पाकिस्तानातून भारताकडे येत आहेत.

टोळधाड नियंत्रणासाठी फवारणीकरिता ८०० ट्रॅक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. २०० पथके दैनंदिन सर्वेक्षण करीत असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. जयपूरमधील निवासी भागातील झाडे आणि भिंतींवर सध्या टोळधाडीच्या झुंडी दिसून येत आहे. तसेच काही तासांनंतर त्या दौसाकडे जात असल्याचे श्री. ओमप्रकाश यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमध्ये दक्षतेचा इशारा शिमला ः शेजारील राज्यांमध्ये टोळधाडीने पिकांचे केलेले नुकसान पाहता कांग्रा, उना, बिलासपूर, सोलन या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याचे कृषी संचालक डॉ. आर.के. कौंदल यांनी सांगितले. ते म्हणाले, की टोळधाडीच्या झुंडींवर लक्ष ठेवण्याच्या तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. टोळधाड आढळल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.   ‘टोळधाड नियंत्रणासाठी ब्रिटनकडून १५ फवारणी यंत्रांची खरेदी’ नवी दिल्ली ः देशाच्या विविध राज्यांमधील टोळधाड नियंत्रणासाठी ब्रिटनकडून १५ फवारणी यंत्रे खरेदी करण्यात आली असून ती येत्या १५ दिवसांत दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. श्री. तोमर यांनी देशातील टोळधाडीसंदर्भात नुकतीच उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार टोळधाडबाधित राज्यांच्या संपर्कात असून त्यांना सातत्याने सल्ले देत आहे.

येत्या एक ते दिड महिन्यात अजून ४५ फवारणी यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. उंच झाडे आणि दुर्गम ठिकाणी कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाईल, तर हवाई फवारण्यांसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्याचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार, या टोळधाडीच्या झुंडी पाकिस्तानातून दाखल झाल्या आहेत. यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशातील उभे कापूस पीक तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही राजस्थानला टोळधाडीचा मोठा फटका बसला आहे.   राजस्थानमधील टोळधाड दृष्टिक्षेपात

  • २० जिल्ह्यांतील ९० हजार हेक्टरला फटका
  • उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशकडे जात आहेत झुंडी
  • २०० पथकांव्दारे दैनंदिन सर्वेक्षण
  • शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे मोफत वाटप
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com