पणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची राज्यात अंमलबजावणी करणाऱ्या अध्यादेशाला राज्य सरकारने पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची राज्यात अंमलबजावणी करणाऱ्या अध्यादेशाला राज्य सरकारने पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या अपिलावर जलदगतीने सुनावणी घेऊन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी (ता.३०) अध्यादेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पुढील सुनावणी येत्या २७ ऑक्टोबरला पुन्हा घेण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

तीन कृषी विधेयकांबाबत केंद्र सरकारने कायदा मंजूर करण्यापूर्वी जारी केलेल्या अध्यादेशांची महाराष्ट्रात सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश ऑगस्टमध्येच पणन खात्याने जारी केले होते. राज्याच्या पणन संचालकांनी या अध्यादेशांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र आधी अध्यादेश लागू करण्याचा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता या शेतकरी विधेयकांना ठाम विरोध केला आहे.  संसदेने याबाबत मंजूर केलेले कायदे राज्यात लागू न करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच गेल्या आठवड्यात केली होती. काँग्रेसचाही या कायद्यांना ठाम विरोध आहे. 

त्यातूनच या कायद्याच्या अंमलबजावणीला राज्यात स्थगिती देण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सहकार व पणन मंत्र्यांसमोर याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी पणन संचालकांच्या अध्यादेशासंदर्भातील परिपत्रकाला आव्हान दिले होते.

सुनावणीदरम्यान या कायद्यामुळे कृषी बाजार व्यवस्थेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व्यापारी, दलाल, माथाडी, मापाडी, कंत्राटी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी अशा सर्व महत्त्वाच्या घटकांवर विपरित परिमाण होणार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. काही घटकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून स्थापन झालेल्या नियंत्रित बाजाराच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे शशिकांत शिंदे यांच्यावतीने सांगण्यात आले. 

यावेळी करण्यात आलेली स्थगितीची विनंती मान्य करत आदेश काढण्यात आला. त्यानुसार पणन संचालक यांनी जारी केलेल्या परिपत्रकाला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला पुन्हा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासाठी नवा कायदा करू ः पाटील परिपत्रकाला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर पत्रकारांशी बोलताना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला अनेक राज्यांचे तीव्र आक्षेप आहेत. आमचाही विरोध आहे.  कृषी विधेयकावर आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका नाही. संबधित कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी असू नयेत, अशी सरकारची भूमिका आहे.

कृषी विषय राज्याच्या सूचीतला आहे. त्यामुळे विधेयकांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. हा केंद्राचा कायदा आहे. यावर कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता, आत्तादेखील घेत आहोत. सध्या तरी आम्ही अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. अभ्यास करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा नवीन कायदा करणार आहोत, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com