शेतकरी कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना बंद करू नका : फडणवीस

राज्य सरकारने मुंबईतील नाइट लाइफपेक्षा शेतकऱ्यांच्या नाइट लाइफची चिंता करावी. त्यासाठी कृषिपंपांना दिवसा १२ तास अखंड वीजपुरवठा करावा. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

परभणी  ः  दुष्काळमुक्तीसाठी भाजप सरकारने सुरू केलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना तसेच समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी केलेली योजना राज्य सरकारने पुढे न्यावी. वाटले तर त्यात काही बदल करावेत. परंतु, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजना बंद करू नयेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

परभणी येथील वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयात शुक्रवारी (ता. ७) आयोजित कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, गजानन घुगे आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रतिकूल स्थितीत शेती व्यवसायात टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अंतिम उपाय नाही. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावे दुष्काळमुक्त झाली. मागेल त्याला शेततळे योजना सुरू केल्यामुळे फळपिकांखालील क्षेत्रात वाढ झाली. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मागील सरकारने सुरू केलेल्या योजना राज्य सरकारने बंद करू नयेत; अन्यथा मराठवाड्यातील शेतकरी, नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com