मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत अपेक्षांची पूर्ती व्हावी ः पंकजा मुंडे

मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी हे लाक्षणिक उपोषण केले आहे. भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना आत्ताच्या सरकारने पुढे नेल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.
लहान मुलीच्या हस्ते लाक्षणिक उपोषण सोडताना माजी मंत्री पंकजा मुंडे
लहान मुलीच्या हस्ते लाक्षणिक उपोषण सोडताना माजी मंत्री पंकजा मुंडे

औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे; तर सरकारकडून मराठवाड्यातील जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नाबाबत असलेल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून लाक्षणिक उपोषण केल्याचे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्‍नासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि भाजपच्या वतीने  माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लाक्षणिक उपोषणाची गरज व भूमिका स्पष्ट केली. उपोषणस्थळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, मेघना बोर्डीकर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारच्या तुलनेत चांगले काम करून दाखवावे ही अपेक्षा आहे. मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेऊन आधीच्या सरकारप्रमाणे मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. या वेळी  एका लहान मुलीच्या हाताने लिंबू सरबत घेऊन पंकजा मुंडे यांनी उपोषण सोडले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत लेखी निवेदन दिले. या आहेत प्रमुख मागण्या

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे.
  • विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत.
  • जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी.
  • मराठवाडा वॉटरग्रिड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत.
  • कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
  • जायकवाडी धरणात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून देऊन ते कालव्याद्वारे सिंदफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे.
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा.
  • औरंगाबाद शहराची १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी
  • बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com