शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका

मुंबई  ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गतीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

सोमवारी (ता. २) मंत्रालयात या संदर्भात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तयारीच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या १ कोटी ३ हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रालयातील या बैठकीला मंत्री म्हणून छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याबाबत आर्थिक स्थितीचा आढावा सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ३५ ते ४० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे. हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकते, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाला दिला. राज्याची आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला ७ टक्‍के व्याजदराने काही रक्‍कम कर्जरूपाने उभी करणे शक्‍य आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते कंपन्यांकडे भरले आहेत.

राज्य सरकारनेदेखील स्वतःचा हिस्सा या कंपन्यांकडे दिला आहे. मात्र, १५ हजार कोटी रुपयांची पीकविमा रक्कम अद्यापही कंपन्यांकडे थकीत आहे. ही रक्‍कम विमा कंपन्यांकडून वसूल केल्यास कर्जमाफीसाठीची रक्‍कम तातडीने उभी करण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चादेखील या बैठकीत झाली. 

नव्याने संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी निधी उभारण्याबाबतही या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जुन्या काही योजना बंद करणे, सध्या सुरू असलेल्या, परंतु १० टक्क्यांपर्यंतच राबविल्या जाणाऱ्या योजनांना कात्री लावणे, दीर्घमुदतीचे कर्ज उभारणे हे पर्यायदेखील समोर आले आहेत. बैठकीत कृषी, सहकार, महसूल, मदत व पुनर्वसन आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले. फडणवीस सरकारने आत्तापर्यंत ४४ लाख शेतकऱ्यांना १८,८९१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. त्या कर्जमाफीपोटी तेव्हा २४ हजार कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६००० कोटी अद्यापही शिल्लक आहेत, अशी माहितीदेखील या बैठकीत समोर आली. 

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत चक्रीवादळांमुळे झालेल्या पावसाचा राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. पंचनाम्यांनुसार सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक कोटी ३ हजार शेतकरी संकटाने भरडले आहेत. त्यांनाही तातडीने मदत देण्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे हा किती आर्थिक भार तिजोरीवर पडेल याचीही आकडेमोड सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com