नगर जिल्ह्यात बहुतांश रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाची अवस्था बघवत नाही. पावसामुळे कांदा रोप व पावसाळी कांदा पिकाचे प्रंचड प्रमाणांत नुकसान होऊन पीक वाया गेले. मोठ्या प्रमाणात खर्च झाला. आता करपा रोगांसह काळ्या व पांढऱ्या मावा किडीने कांद्याचे पीक धोक्‍यात आले आहे. रोग नियंत्रणाबाबत कसे करायचे, याबाबत मात्र कृषी विभागाकडून कसलीही माहिती दिली जात नाही. - विजय कोपनर, शेतकरी, निंबे, ता. कर्जत, जि. नगर.
कांदा पिकावर माव्याचा झालेला प्रादुर्भाव
कांदा पिकावर माव्याचा झालेला प्रादुर्भाव

नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने हवामान बदल होत आहे. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील कांदा, हरभरा, ज्वारी, मका, गव्हावर परिणाम दिसू लागला आहे. कर्जत तालुक्यातील काही भागांत कांद्यावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांवरील कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहेत. 

जिल्ह्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मध्यंतरीच्या दोन दिवस पावसाची भुरभुरही झाली. याशिवाय सातत्याने धुके पडत असून दुपारी उन्हाचा चटका वाढत आहे. सातत्याने बदलत असलेल्या हवामानामुळे रब्बी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. सध्या कांदा, गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जोमात आहेत. मात्र सतत बदलत्या हवामानामुळे या पिकांवर मावा या किडींसह करपा, चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पारनेर तालुक्यातील कुकडी पट्ट्यातील शिरापूर, वडनेर बुद्रुक, निघोज, गाडीलगाव- गुणोरे, पठारवाडी, जवळा, राळेगण थेरपाळ, म्हस्केवाडी, कोहकडी, कुंरुद आदि गावासह कर्जत, नगर, राहुरी, कोपरगाव आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे.

मात्र ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव झाला असला असून, काही ठिकाणी कांद्याच्या पाती करपल्या आहेत. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिकांवरील या रोगांवर नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

मार्गदर्शन कोण करणार?  रब्बी पिकांवर बदलत्या हवामानामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यांच्या नियंत्रणाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन  मिळणे गरजेचे आहे. मात्र अद्यापर्यंत तरी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कीडरोग नियंत्रण कसे करायचे, मार्गदर्शन कोण करणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या उलट खासगी निविष्ठा विक्रेते व एजंट यांनी कीटकनाशकांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे कीटकनाशक खात्रीशीर आहे का याची तपासणी कृषी विभागाने करायची असते. तेही कोठेच केल्याचे दिसत नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com