संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफीबाबत तातडीने निर्णय घ्या : राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

सोलापूर ः एकापाठोपाठ एका नैसर्गिक आपत्तीने राज्यातील शेतकरी आधीच खचले आहेत, त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिलमाफीचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी (ता. ११) सोलापुरात झाली. बैठकीदरम्यान श्री. शेट्टी बोलत होते. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, रविकांत तुपकर, अमोल हिप्परगी, सुवर्णा अपराजित, पूजा मोरे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, संघटक विजय रणदिवे आदी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. तसेच जिल्हानिहाय कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.

यावेळी श्री. शेट्टी म्हणाले, की राज्याच्या महाविकास आघाडीत आम्ही सहभागी आहोत, म्हणून गप्प बसू असे नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कदापि मागे हटणार नाही. आम्ही आमची भूमिका मांडतच राहणार. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकटे येत आहेत. त्यावर मार्ग निघाला पाहिजे. पुढील काळात संघटना म्हणून नव्या दृष्टीने या प्रश्‍नावर आंदोलन करण्याची गरज आहे. येत्या ८ जानेवारीला देशभर ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला आहे. आम्ही त्यात सहभागी होणार आहेत. शेतकरी आणि त्यांचे प्रश्‍न हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आश्‍वासने दिली आहेत. ती पूर्ण व्हायला पाहिजेत.  

या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांसाठीही काही सूचना दिल्या. तसेच आगामी काळात संघटनेची भूमिका काय आणि कशी असावी, याबाबतही मते जाणून घेतली. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफी द्यावी आणि यंदा उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, असे ठराव बैठकीत करण्यात आले.

संघटनेची राज्य कार्यकारिणी बरखास्त  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण राज्य कार्यकारिणी या बैठकीत बरखास्त करण्यात आली, तशी घोषणा श्री. शेट्टी यांनी बैठकीत केली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वतःची आता आदर्श आचारसंहिता असेल, त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

पुढील महिन्यात ११ जानेवारीला जिल्हा आणि राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकाच वेळी होतील. तसेच राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत राहील. फेब्रुवारीमध्ये राज्य कार्यकारिणीची पुन्हा एक बैठक होणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नव्या लोकांना, तसेच तरुणांना अधिक संधी देण्यात येणार असल्याचेही श्री. शेट्टी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com