जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !

जिल्ह्यात युरिया वगळता पोटॅश, फॉस्फेट व इतर संयुक्त खतांची कुठलीही टंचाई नाही. - मधुकर चौधरी,कृषी विकास अधिकारी, जळगाव
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. यातच यंदा हंगाम अपेक्षेपेक्षा अधिक असून, रासायनिक खतांची मागणीदेखील वाढली आहे. सध्या युरियाची मागणी अधिक असल्याने जिल्ह्यातील युरियाचा साठा संपला आहे. 

युरियाचा सुमारे ३० हजार मेट्रिक टन साठा शिल्लक होता. कारण, खरिपात खतांची उचल अतिपावसामुळे झाली नव्हती. ही उचल झाली नसल्याने विक्रेत्यांकडे साठा पडून होता तसेच साठा शिल्लक राहिल्याने कंपन्यांकडूनही खतपुरवठा कमी करण्यात आला होता. हा पुरवठा कमीच राहिल्याने व युरियाची मागणी मागील पंधरवड्यात वाढल्याने युरियाचा ३० हजार टनांचा साठा जवळपास संपला आहे. विक्रेत्यांकडून खतपुरवठादार कंपन्यांकडे युरियाची मागणी वाढली. यामुळे पुरवठादारांकडून मागील आठवड्यात युरिया पुरवठ्यासंबंधी गतीने कार्यवाही सुरू झाली आहे.

मागील आठवड्यात नर्मदातर्फे (जीएनएफसी) ३२०० टन युरियाचा पुरवठा झाला आहे; तर या आठवड्यात दोन कंपन्यांकडून मिळून चार हजार टनांपेक्षा अधिक युरियाचा पुरवठा अपेक्षित आहे. यातील खतांचा एक रेक पाचोरा येथे रिकामा केला जाणार आहे. 

शेतकरी सध्या गहू, ज्वारी, बाजरी, मका आदी रब्बी पिकांना युरियासह इतर संयुक्त खतांची मात्रा देत आहेत. ही मात्रा देताना युरियाचा वापर अधिक केला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी खतांची पहिली मात्रा दिली आहे. दुसरी मात्रा देताना युरिया व संयुक्त खताचा वापर केला जात आहे. सर्वच पिके जोमात असल्याने व पेरणी वाढल्याने रासायनिक खतांची मागणी जिल्ह्यात वाढली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com