नगर ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले. हे लॉकडाऊन नगर जिल्ह्यातील फळे, भाजीपाला उत्पादकांच्या मुळावर आले आहे. जिल्ह्यातून होणारा ३०० ते ४०० टन भाजीपाला पुरवठा थांबला आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लॉकडाउनचा फटका अजूनही भाजीपाला उत्पादक सोसत असताना आता पुन्हा कोट्यवधींचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदे, शेवगाव, जामखेड भागातून पुणे आणि मुंबईला भाजीपाला, फळे पुरवठा केला जातो. मार्चमधील लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठा थांबल्याने शेतकऱ्यांना सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिक फटका सहन करावा लागला होता.
महिनाभरापासून भाजीपाला, फळांचा पुरवठा सुरळीत झाला असताना आता पुन्हा पुण्यात लॉकडाउन करण्यात आल्याने व बाजार समितीतील व्यवहार बंद झाल्याने नगरमधील शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे केवळ शेतीमालाचे नाही, तर त्यावर आधारित शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडून जाणार हे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्ह्यातून सुमारे ५० शेतकरी गटांसह पाचशेवर शेतकरी स्वतः भाजीपाला, फळांची पुणे, मुंबई व अन्य काही भागांत थेट विक्री करतात. त्यावरही परिणाम झाला आहे.
माझ्याकडे शेवगा आहे. आम्ही थेट विक्रीसाठी पुरवठा करतो. पुण्यातील लॉकडाउनचा विक्रीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असून आर्थिक फटकाही सोसावा लागणार आहे, असे खर्डा येथील शेतकरी ज्ञानेश्वर इंगोले यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.