कृषिमंत्री दर पंधरवड्याला जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषिमंत्री दादा भुसे यांना सेंद्रिय तांदूळ भेट देताना गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी
कृषिमंत्री दादा भुसे यांना सेंद्रिय तांदूळ भेट देताना गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी

नागपूर  ः शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्या माध्यमातून त्यांच्या संवेदना जाणता येतात, त्याकरिता त्यांच्या बांधावर पोचा. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करणार असून, दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाईन. त्याचप्रमाणे कृषी सचिव, आयुक्‍तदेखील १५ दिवसांनी शेतावर जातील. खालच्या फळीतील सर्व अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला तीन शिवारांना भेटी द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

वनामती येथे कृषी विभाग आणि शेतकरी संवाद कार्यक्रमात ते शुक्रवारी (ता.७) बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांची या वेळी उपस्थिती होती. 

मंत्री भुसे म्हणाले, की राज्यातील शेतकरी आत्महत्या वेदनादायी आहेत. शेतकरी आपले दुःख, प्रश्‍न मांडण्यास कचरतात. त्यातूनच पुढे प्रश्‍नांचा गुंता वाढतो आणि तो आत्महत्येकडे वळतो. हे थांबविण्यासाठी कृषी विभाग गावापर्यंत पोचवा. काही निवडक शेतकरीच मॉडेल म्हणून कृषी विभागाकडून पुढे आणले जातात. एका गावातील त्या चार दोन शेतकऱ्यांपेक्षा प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यात अपयश आले आहे. त्यामागे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील हरविलेला संवाद हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे दत्तक घेतल्याप्रमाणे त्याच त्या शेतकऱ्यांकडे न जाता नवे शेतकरी तयार करा. त्यातून निश्‍चितच परिवर्तन होणार आहे. हा बदल व्यापक असावा,

याकरिता कृषिमंत्री म्हणून मी स्वतः दर पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांकडे जाईल. कृषी सचिव, कृषी आयुक्‍त, विभागीय कृषी सहसंचालक, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह सर्वच बांधावर जातील. त्याकरिता वरिष्ठांना पंधरा दिवसाला दोन शिवारांना भेटी तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याला शिवारभेटीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगांना चालना द्या. पोकरा मधून केवळ शेळ्यांसाठी अनुदान न देता त्यामाध्यमातून उद्योजक घडतील. या वेळी त्यांनी संत्रासह विविध पिकांची उत्पादकता जाणून घेतली. पूर्व विदर्भातील विकासासाठी काय करता येईल, याची माहितीही त्यांनी घेतली. गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश पवार यांचा या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यासोबतच सहा जिल्ह्यांतील निवडक प्रयोगशील शेतकऱ्यांनाही गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वेळी आणलेला खास सेंद्रिय तांदूळ कृषिमंत्र्यांना भेट दिला.    संवाद आणि संवेदना जपा ः डवले

कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषिमंत्र्यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या संवेदना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जपण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले. त्याकरिता कामात सुधारणा करा, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com