तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस पिकांच्या मुळावर उठला आहे. ज्वारी व हरभऱ्याची मळणी करत असतानाच अचानक वादळासह पाऊस आला आणि गोण्यांतील शेतीमाल भिजला - धनंजय सोळंके, शेतकरी, नागापूर, जि. बीड.
धनंजय सोळंके यांचे मळणी केलेले धान्य पावसाने भिजल्याने ते वाळविण्याची वेळ त्यांच्यावर आली.
धनंजय सोळंके यांचे मळणी केलेले धान्य पावसाने भिजल्याने ते वाळविण्याची वेळ त्यांच्यावर आली.

औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान कायम असतानाच मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (ता ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात जोरदार वादळ व काही ठिकाणी तुरळक गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस होत आहे. या पावसासोबतच वादळ व काही ठिकाणी होत असलेल्या गारपिटीमुळे फळ पिकांसह उशीराने पेरणी होऊन आता काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी (ता ३०) रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

प्रशासनाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, कांचनवाडी, चिकलठाणा, करमाड, पिंपळवाडी, शिऊर, करंजखेडा, सोयगाव, सावलदबारा, आळंद या दहा मंडळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील राजूर, वाग्रुळ, विटेगाव, रामनगर, जामखेड, रोहिलागड, गोंदी, परतुर, वाटुर, आष्टी, सातोना, शेलगाव, बावणे पांगरी, घनसावंगी, तीर्थपुरी, रांजणी, जांबसमर्थ, मंठा, तळणी, ढोकसाळ आदी वीस मंडळात अवकाळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील शेलगाव मंडळात सर्वाधिक ११.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अधिक होता.

बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, आणि शिरूर कासार आदी तालुक्यांतील काही मंडळात वादळी वारे व काही ठिकाणी तुरळक गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड तालुक्यातील पाली, राजुरी, लिंबागणेश, पेडगाव, चौसाळा, नेकनुर, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, अमळनेर, गेवराई तालुक्यातील गेवराई व सिरसदेवी, माजलगाव तालुक्यातील गंगामसला व किट्टीवडगाव, परळी तालुक्यातील नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव, धारुर तालुक्यातील मोहोखेडा, वडवणी तालुक्यातील वडवणी व कवडगाव तसेच शिरूर कासार तालुक्यातील रायमोह आदी १९ मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यातील सिरसाळा मंडळात सर्वाधिक २७ तर पिंपळगाव मंडळात २५.२५, रायमोह १२.२५, गंगामसला १८.७५ तर राजुरी मंडळात ११.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली तर काही शेतकऱ्यांचा मळणी केलेला व सोंगून ठेवलेला शेतीमाल भिजला.   पिकांना मोठा फटका सिरसाळ्यात सोमवारी (ता.३०) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. विजेचा कडकडाट, सोसाटयाच्या वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. यामुळे काढणीला आलेली ज्वारी, कडबा, गहू, हरभरा या पिकांना पुन्हा फटका बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोणी दखल घेत नाही. विमा कंपन्यांच्या वेबसाईट बंद आहेत. विमा उतरविलेला आहे पण वेबसाईट बंद असल्याने कंपन्यांना पीक नुकसान कळवावे कसे हा प्रश्नच आहे, असे विरमगाव येथील आंबा उत्पादक  गवनाजी अधाने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com