ताकारी योजनेचे आवर्तन लांबले

ताकारीचे आवर्तन लांबल्याने ऊस पिक असे वाळू लागले आहे
ताकारीचे आवर्तन लांबल्याने ऊस पिक असे वाळू लागले आहे

सांगली  : ताकारी उपसा जलसिंचन योजनेतून सुटणारे दुसरे पाणी आवर्तन लांबल्याने लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीचा पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. याचबरोबर लाभक्षेत्रातील गावांच्या पाणीयोजनांवरही परिणाम जाणवू लागला आहे. 

ताकारी प्रकल्प क्षेत्रात वाळवा, कडेगाव, तासगाव, पलूस या तालुक्यांतील २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्र असून, त्यापैकी १० हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करून पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु, पहिले आवर्तन सुरू करण्यास विलंब झाला. हे आवर्तन सव्वा महिना सुरू राहिले. परंतु, पहिल्या आवर्तनातून लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी जाण्याअगोदरच ते बंद केले.

रब्बी हंगामाचे वाढलेले सिंचनक्षेत्र, कडाक्‍याचा उन्हाळा, यामुळे जमिनीतून अमर्याद पाणीउपसा होत असल्याने सर्वत्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. याचबरोबर लाभक्षेत्रातील आणि येरळा नदीच्या काठावरील गावांना या नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, सध्या हे सर्व जलस्रोत कोरडे पडल्याने बऱ्याच गावांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्‍कील झाले आहे. 

ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू होण्यासंदर्भात अद्याप शाश्वत माहिती मिळत नाही. बहुतांश शेतातील उभी पिके करपून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरे आवर्तन सुरू करण्यासाठी शेतकरी मागणी करू लागले आहेत. परंतु, ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दुसरे आवर्तन सुरू करण्यास विलंब लागणार असल्याचे चित्र आहे. त्यातही येरळा नदीतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com