नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले. परंतु, पीकविम्यातून वगळल्याने २४ महसूल मंडळातील सुमारे ३५ हजार शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यात शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षांत कापसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होत आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यासह कापसाचे क्षेत्र अधिक असते. परंतु, आता जिल्हाभरात कापसाची लागवड वाढत आहे. गेल्या वर्षी सव्वा लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे आधीच कापसाची वाढ कमी झाली. उत्पादनही घटले. त्यातच कापूस वेचणीला आल्याच्या काळात सलग महिनाभर परतीच्या जोरदार पावसाने तोही वाया गेला.
गेल्यावर्षी कापसाचे जिल्हाभरात सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळासह अन्य कारणांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. गेल्यावर्षी ८५ महसूल मंडळातील ७० हजार १६८ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरवला होता. मात्र त्यातील ६१ महसूल मंडळातील ३५ हजार शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला तर २४ महसूल मंडळांना वगळले. त्यामुळे तेथील ३५ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. एकट्या पाथर्डी तालुक्यात १९ हजार, शेवगाव तालुक्यात ९ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे पीक विम्यापासून शेतकरी वंचित असताना लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत.
विम्यातून वगळलेली महसूल मंडळे अरणगाव, जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव (जामखेड), भांबोरा, मिरजगाव (कर्जत), करंजी, कोरडगाव, माणिकदौंडी, पाथर्डी, टाकळी मानूर, आश्वी, पिंपळनेर, साकूर, शिबलापूर (संगमनेर), बोधेगाव, चापडगाव, (शेवगाव) बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, काष्टी, मांडवगण, पेंडगाव, श्रीगोंदा. कापूस पीक विम्याची स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.