घराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून पडल्याची शिऊरच्या शेतकऱ्यांची व्यथा

आमच्यावरच काय, सर्व शेतकरी आणि जगातील प्रत्येक माणसावर संकट आलय. यंदा पहिल्यांदाच शेवगा, पेरू, कारल्याचे पीक हाती आले. पण माणसेच जर रस्त्यावर दिसत नाहीत तर हा शेतीमाल घेणार कोण, परदेशात निर्यातीला संधी होती. पण ‘बंद’मुळे साऱ्या मेहनतीवर पाणी फिरले. शेवटी आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावेच लागणार आहे. - संदिपान निंबाळकर, शेतकरी, शिऊर, जि. नगर.
शिऊर, जि. नगर ः पेरूच्या बागेतील फळे दाखवताना संदिपान निंबाळकर.
शिऊर, जि. नगर ः पेरूच्या बागेतील फळे दाखवताना संदिपान निंबाळकर.

नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक शेतकऱ्यांच्या हाती पेरू, शेवगा, कारल्याचे पीक आले. हातात आलेलं पीक विकायला न्यायचं तर  लॉकडाउन झालं. आठ दिवस वाट पाहिली, पण वाहतूक करायला अडचणी. विकायला नेलेच तर बाजारात भाव नाही. निम्म्या दरातही कोणी घेईनात. घराला भरभराट देणारी फळं जागेवर गळून पडू लागली. शेतीमाल विकता न आल्याने कोट्यवधींचा फटका बसला. साऱ्यांवरच वेळ आलीय. माणूसच रस्त्यावर नाही तर दोष कोणाला द्यायचा, असे सांगत शिऊर (ता. जामखेड) येथील शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. 

‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून गेले दहा दिवसांपासून लॉकडाउन केल्याने सगळ्यांनाच फटका बसलाय. जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिऊर येथे अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनाही या बंदचा मोठा फटका सोसावा लागत आहे. यापूर्वी येथील शेतकऱ्यांनी भोपळ्याचे यशस्वी उत्पादन घेतले. करारावर पावडर करणाऱ्या कंपनीला त्याची विक्री केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी गावांतील सुमारे ३० एकरांवर पेरू, ४० एकरांवर कारल्याची लागवड केली.

यंदा पहिल्यांदाच पीक हाती आले आणि ऐन विक्री करायच्या काळात ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे मालाची विक्री करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात नेऊन विक्रीचा प्रयत्न केला. मात्र दरात मोठी तफावत असल्याने मजुरी आणि वाहनाची भाडेपट्टीही निघत नाही. ६० रुपये किलोने विकला जाणारा पेरू १२ रुपये किलोने पोच करावा लागतोय. ३० ते ४० रुपये किलोने विकला जाणारा शेवगा १० रुपये किलोने विकला जातोय आणि ४० रुपये दराने विकले जाणारे कारले आज २० रुपये किलोने विकावी लागत आहेत. शेवगा निर्यात करण्याची संधी होती. ६० रुपये किलोने विक्रीबाबत बोलणेही झाले होते. ही संधीही ‘कोरोना’मुळे गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.  

शिऊर येथील संदिपान निंबाळकर म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साडेतीन एकरांवर पेरूची लागवड केली होती. यंदा पेरू बहारदार पेरू आले. विक्री करायच्या वेळीच लॉकडाउन झाले. पिकलेले पेरू विकायची अडचण निर्माण झाली. त्यामुळे वाया जाऊ न देता लोकांनी बागेतून पेरू न्यावेत असे आवाहन केले. तहसीलदारांनी पेरू बागेला भेट देऊन आलेल्या पिकाचे कौतुक केले. मात्र लोक तरी किती पेरू नेणार. ज्यांना शक्य झाले त्यांनी नेली, पण अर्ध्याहून अधिक फळे वाया गेली.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com