कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला
कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला

कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी संवाद

नगर  ः  सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लई वेळा हेलपाटे मारावे लागले. या वेळी मात्र फक्त अंगठा दिला अन् काम झालं, अशी भावना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील पोपटराव भानुदास मोकाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.  

नगर जिल्ह्यामधील ब्राम्ह्मणी (ता. राहुरी) व जखणगाव (ता. नगर) या गावांतील कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर केल्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात सोमवारी झाली. प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी काही गावांतील पात्र लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकऱ्यांना संवाद साधण्याची यावेळी संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.

लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सुरुवातीला मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर ब्राह्मणी येथील पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले यासह अन्य बाबी विचारल्या. ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ झाल्याने समाधान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी ब्राह्मणी येथील उषाबाई हापसे, मीराबाई हापसे, गणपत जाधव, पोपट मोकाटे, संतोष ठुबे, दिलीप तारडे, राजेंद्र बानकर, पंढरीनाथ बानकर, पोपट ठुबे, भास्कर ठुबे हे पात्र शेतकरी तर जखणगाव येथील रामचंद्र जाधव, बाळू वाळके, पंकज पवार, बंडू वाळके, छाया पवार, अशोक भिसे, विष्णू कर्डिले, बेबी कर्डिले, उमराव शेख, विठ्ठल वाळके आदी शेतकरी सहभागी झाले होते. जखणगाव आणि ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर कर्जमाफी जाहीर केली आहे. तेथील तलाठी कार्यालयात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. त्यांची यादी लावली. दोन्ही गावांतील एकूण ९७२ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com