राष्ट्रवादी गुरुवारी साजरा करणार बळिराजा कृतज्ञता दिन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा गुरुवारी (ता. १२) वाढदिवस असून, या वर्षी पक्षाच्या वतीने हा दिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच, बळिराजा कृतज्ञता कोश तयार करून श्री. पवार ८० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने ८० लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष, आमदार नवाब मलिक यांनी दिली. जमा झालेला हा निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई येथे सोमवारी (ता. ९) आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार असून, अशा प्रकारचा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे. 

श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांच्या वतीने विकास आणि परिवर्तनाचा महानेता या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तसेच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये फळवाटप केले जाणार आहे. मुंबईत युवकांच्या वतीने ११ ते २० डिसेंबरदरम्यान सर्व रुग्णालयांच्या परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.   भाजप देशात विभाजनकारी मानसिकता आणतेय ः मलिक देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष, आमदार नवाब मलिक यांनी केला. मुंबईत सोमवारी (ता. ९) आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.

या वेळी ते म्हणाले, की सोमवारी संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणे योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झाले पाहिजे. याबाबत सर्वेच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू होती. देशातील मुसलमान घुसखोर आहेत असे वातावरण तयार करून त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होता. मात्र १९ लाख लोकांना नागरिकत्व मिळाले नाही हे समोर आले आहे. त्यात १६ लाख हिंदू, ३ लाख मुस्लिम आहेत. आता १६ लाख हिंदू असल्याचे समोर आल्यावर त्यांचे करायचे काय म्हणून हा कायदा भाजपने आणला आहे. परंतु त्या-त्या राज्यातील लोक धर्मावर आधारित हा कायदा स्वीकारणार नाहीत.

घटनेत तरतूद असताना धर्माच्या नावावर नागरिकत्व सुधारणा कायदा करणे योग्य नाही. त्यावर संसदेत आम्ही आवाज उठवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com