‘नाफेड’च्या खुल्या पद्धतीने कांदा खरेदीला उद्यापासून सुरुवात

चालू वर्षी केंद्र सरकारच्या कांदा खरेदीच्या सूचनेनुसार संचालक मंडळाचा निर्णय झाला आहे. मजुरांचा प्रश्न सुटल्यानंतर सोमवारपासून (ता.४) राज्यात बाजार समितीच्या माध्यमातून खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. - नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड, नवी दिल्ली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक   :केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टांनुसार ‘नाफेड’च्यावतीने कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यात ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे. त्याअनुषंगाने बाजार समित्यांमधून खुल्या लिलाव पद्धतीने तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिवार खरेदी पद्धतीने कांदा खरेदी केला जाणार आहे. जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत उद्यापासून (ता.४) कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

‘नाफेड’च्या संचालक मंडळाच्या २९ एप्रिलला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र मजूर नोंदणी निविदा व नाफेड कर्मचाऱ्यांची उपलब्धता या कारणांमुळे खरेदीचा निर्णय लांबला होता. मात्र यावर निर्णय झाल्याप्रमाणे कांदा खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने लासलगाव येथे खुल्या पद्धतीने कांदा लिलावासाठी ‘नाफेड’ उतरणार आहे. तसेच पिंपळगाव बसवंत येथेही खरेदीची तयारी सुरू आहे. चांगली टिकवण क्षमता असलेला उच्च गुणवत्तेच्या कांद्याच्या खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे.

सध्या नाफेडकडे स्वमालकीचे तसेच एनएचआरडीएफ व व्यापाऱ्यांच्या भाडेतत्वावर घेतलेल्या कांदा चाळींची साठवणूक क्षमता १४ हजार मेट्रिक टनांपर्यंत आहे. त्यातुलनेत मागील वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे अधिक साठवणूक क्षमता असल्याने त्यांच्याकडे कांदा साठवला होता. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे. सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नायगाव (ता.सिन्नर), ताहाराबाद(ता.सटाणा) तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव (ता.जुन्नर) येथे शिवार खरेदी पद्धतीने कामकाज सुरू झाले आहे. त्यानुसार या कंपन्या नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी करणार आहेत.

चालू वर्षी उन्हाळ कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या कांद्याला अपेक्षित दर नाही. मात्र नाफेडच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून भाव स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी राज्यात ४५ हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. मात्र ४७ हजार टन कांदा खरेदी झाला. यावर्षी ५ हजार टनांनी उद्दिष्ट वाढलेले आहे, यात अजून वाढ व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

खरेदीचे उद्दिष्ट वाढण्याची शक्यता; मागणीचा रेटा महत्त्वाचा ‘नाफेड’ या वर्षी ७० हजार मेट्रिक टनांपर्यत कांदा खरेदी करेल अशी शक्यता होती. मात्र ५० हजार टनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र ही खरेदी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने उद्दिष्ट वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आग्रह धरल्यास खरेदीचे उद्दिष्ट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे याबाबत मागणी लावून धरावी लागणार आहे. 'नाफेड' व 'महाएफपीसी'चा 'महाओनिअन'हा संयुक्त उपक्रम आहे. त्यामाध्यमातून २५ हजार टन साठवणूक क्षमता विकसित करण्यात येत असून १५ ठिकाणी कामकाज सुरू आहे. शिवार खरेदीच्या माध्यमातून २५ हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com