खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत वादळी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान आहे. यामुळे औरंगाबाद, नगर, जळगाव, धुळे, जालना, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील काही भागांत गुरुवारी (ता. १२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जळगावमधील उत्राण येथे गारपीट झाल्याने कांदा, तूर, कापूस पिकांसह पपई, पेरू, डाळिंब बागांचे नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली होती.  

हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वीच या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ हवामान तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास विदर्भातील अकोट (जि. अकोला) तालुक्यात पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरा बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांत पाऊस झाला. तर रात्री उशिरा अकोला तालुक्यात, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, मेहकर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिक नव्हता. पण पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला.

मराठवाड्यातील औरंगाबाद शहर परिसर व खुल्ताबादमधील मावसाळा, दौलताबाद येथे हलका पाऊस झाला. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. जालन्यातील मुंडगाव परिसरातही हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, कांदा पिकांचे काहीअंशी नुकसान झाले आहे.  

मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेर, नेवासा तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धापवळ झाली. पावसामुळे कांदा, गहू, कापूस या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खानदेशातील गुरुवारी दिवसभर हवामान कोरडे होते. सायंकाळनंतर अचानक हवामानात बदल होऊन ढग भरून आले आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. जळगाव व धुळे जिल्ह्यांतील विविध भागांत पावसामुळे नुकसान झाले.

जळगावमधील एरंडोल व पाचोरा तालुक्यांत गारपीट झाली. धुळ्यातही दुपारी काही वेळ पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा ऊन पडले होते. पारोळा तालुक्यातील भोंडण, चोरवड, बहादरपूर, उंदिरखेडा यांसह परिसराला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या मका, ज्वारीचे नुकसान झाले. भोंडण येथे बारीक गारा पडल्या. उत्राण (एरंडोल) येथे अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे मुसळधार पाऊस पडला तर काही वेळ गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाले. पाऊस व गारपिटीमुळे लिंबू, पेरू आदि फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

कीड - रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता मराठवाडा, विदर्भ, खानदेशात पाऊस तसेच ढगाळ वातावरण प्रामुख्याने तुरीच्या पिकाला मारक ठरेल, असे मानले जाते. सध्या तुरीचे पीक शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलेले आहे. या भागात खरिपात तुरीची लागवड झालेली आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने यापूर्वीच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातून वाचलेल्या तूर पिकावर सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com