वऱ्हाडात शेतीमाल विक्रीची कोंडी कायम

लॉकडाउनमुळे सध्या शेतीमाल विक्रीवर मोठी मर्यादा आली आहे. आमच्या भागात जवळपास १५०० एकरांतील कांदा तयार झाला. माझ्याकडे वैयक्तिक ८०० क्विंटल कांदा आहे. शासनाने खरेदी करीत यातून मार्ग काढावा यासाठी मी जिल्ह्यापासून तर थेट पणन संचालकांपर्यंत सर्वांशी बोललो. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. कांदा शेतांमध्ये पडून आहे. याभागातील तापमान ४२ अंशावर पोचले असून त्यात येत्या दिवसांमध्ये वाढच होईल. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणातील कांदा विक्री न झाल्यास साठवण्याची सुविधा नसल्याने तो खराब होण्याचे संकट आहे. -विलास ताथोड, कांदा उत्पादक, तळेगाव,जि. अकोला.
देऊळगावराजा येथे टाकरखेड भागिले, रोहणा येथील रवींद्र भागिले व संदीप नागरे, संजय डोके या शेतकऱ्यांनी शेतकरी ते थेट ग्राहक तत्त्वावर शेतीमाल विक्री सुरु केली. कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला.
देऊळगावराजा येथे टाकरखेड भागिले, रोहणा येथील रवींद्र भागिले व संदीप नागरे, संजय डोके या शेतकऱ्यांनी शेतकरी ते थेट ग्राहक तत्त्वावर शेतीमाल विक्री सुरु केली. कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला.

अकोला  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात शहर, गावखेड्यांतील बाजार बंद असल्याने भाजीपाला, फळे विक्रीच्या मोठ्या समस्येला वऱ्हाडातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून सामोरा जात आहे. काही ठिकाणी कृषी विभागाने समन्वयकाची भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने भाजीपाला, फळे वितरणाची साखळी उभी राहिली. मात्र, सर्व ठिकाणी अशा प्रकारची समन्वयकाची भूमिका वेळेत घेणे गरजेचे होते. प्रामुख्याने आजही शेतीमाल विक्रीची मोठी अडचण आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या प्रामुख्याने केळी, कलिंगड या फळांसह कांदा तसेच अन्य भाजीपाला व्यापारी अत्यंत कमी भावाने मागणी करीत सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठवत आहेत. 

उन्हाळ्यातील मागणीचा लाभ उठविण्यासाठी या भागातील शेतकरी कलिंगडाची लागवड करतात. सध्या कलिंगडाची काढणी सुरु झाली असून दरवर्षीच्या तुलनेत व्यापारी निम्म्या दराने कलिंगडाची मागणी करीत आहेत. ३०० ते ५०० रुपये क्विंटलने मागणी होत आहे. व्यापारी कांदा खरेदी करण्यासही तयार नाहीत. अकोल्यातील भाजीपाल्याचा ठोक बाजार पूर्वीसारखा भरत नसल्याने शेतीमालास तितका उठाव नाही. या ठिकाणावरून खेड्यापाड्यातील बाजारांमध्ये दररोज शेकडो क्विंटल माल जातो, हे सर्व ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका टोमॅटो, मिरची, कारली, कोबी या भाजीपालावर्गीय पिकांना बसला. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याची स्थिती असतानाच दुसरीकडे घाऊकमध्ये बाजारात कांदा मात्र ३० रुपये किलोने विक्री केला जात आहे. शेतकऱ्यांकडील कांदा ६०० ते ७०० रुपये क्विंटलनेही घ्यायला व्यापारी तयार नाहीत. 

कृषी विभागाच्या समन्वयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न  कृषी विभागाने महसूल व पोलिस प्रशासनासोबत समन्वय करीत अकोल्यात सर्वप्रथम मार्ग काढला. संचारबंदीच्या काळात नागरिकांना ताजा भाजीपाला, फळे मिळावीत यासाठी अकोल्यात शेतकरी, शेतकरी गट, तसेच कंपन्यांना पासेस देण्यात आल्या. प्रशासनाने नेमून दिलेल्या कालावधीत शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. सुरुवातीच्या काळात प्रशासनाकडून शेतकऱ्यांची अडवणूकही झाली. मात्र, आता यास्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. शेतीमाल विक्रीची घडी व्यवस्थित बसविण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. बुलडाण्यातही आता कोरोना बाधित असलेला परिसर सोडून इतर भागात शेतकरी भाजीपाला विकू लागले आहेत.

वाशीममध्ये कृषी विभागाने पुढाकार घेत भाजीपाला, फळ विक्रीची घडी बसविण्याचा प्रयत्न चालविला. कृषी विभागाने येथे हॅंडग्लोज व मास्कही पुरविले आहेत. सध्या या प्रकारे थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरु आहे. मात्र या विक्रीला मर्यादा असून उपलब्ध शेतमालाच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. मोठे बाजार पुर्ववत झाल्याशिवाय विस्कळीत झालेली ही घडी सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com