कऱ्हाडमध्ये विक्रीअभावी शेतीमाल कचरापेटीत

शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही अशी सद्यःस्थिती आहे. शेतकरी शेतीमाल घेऊन गेल्यानंतर त्यांचा माल विकलाच गेला पाहिजे. यासाठी शासनाने उपाययोजना करावी. तरच शेतकरी या संकटातून तरेल, अन्यथा त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल. - शंकरराव खोत,कृषिभूषण शेतकरी, वाजेवाडी
 मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याने शेतीमाल कचरापेटीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याने शेतीमाल कचरापेटीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी चार-सहा महिने मोठ्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला पदरमोड करून विक्रीसाठी कऱ्हाड बाजारात आणला. मात्र लॉकडाउनमुळे त्यापैकी काही शेतमाल विकलाच गेला नाही. अगोदरच बाजारापर्यंत शेतीमाल आणताना वाहनांसाठी झालेली पदरमोड भरून काढायची पंचाईत असताना पुन्हा तो माल उचलून दुसरीकडे विक्रीसाठी नेणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल कचरापेटीत, रस्त्यावर फेकून देत घर गाठावे लागले. चार पैसे मिळायच्या हंगामातच लॉकडाउन झाल्याने शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.  

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी सर्वच बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्या आर्थिक गर्तेत शेतकरीही सापडले आहेत. सध्याच्या हंगामात पालेभाज्या आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. गावोगावच्या जत्रा-यात्रा, लग्न, उत्सव, सण असल्याने या कालावधीत त्याला मागणीही मोठी असते. त्यादृष्टीने शेतकरी दरवर्षी नियोजन करतात. सध्या शेतांमध्ये शेतीमालही चांगला आला आहे. मात्र त्याच्या विक्रीलाच ग्रहण लागले आहे.

सरकारने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आणण्याकरिता मुभा दिली आहे. त्यानुसार शेतकरी पदरमोड करून भाडेपट्टीने वाहन करून शेतमाल विक्रीसाठी मार्केटला आणत आहेत. मात्र तेथेही पहिल्यासारखी मागणी नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल विकला जाईलच याची खात्रीच नाही. त्यातच बाजारापर्यंत शेतीमाल नेण्यासाठी भाडेपट्टीने वाहन करावे लागते. त्यासाठी केलेली पदरमोड अंगावर असताना शेतीमाल विक्री झाला नाही म्हणून दुसऱ्या वाहनाने पुन्हा दुसरीकडे भाजीपाला नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी मार्केटमध्ये आणलेला शेतमाल अनेक शेतकरी कचरापेटी, रस्त्यांवर फेकून देत घरी निघून जात आहेत. 

शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला सर्वच शेतीमाल विकला जात नाही. त्यामुळे काहीजण तो कचरापेटीत टाकून घराकडे जात आहेत. काही जण त्या परिसरातील रस्त्यावरच तो टाकत आहेत. त्यातच शहर व परिसरातील काही जनावरे, पाळीव प्राण्यांना चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये भाजीपाला पडला आहे याची माहिती मिळाल्यावर ज्यांच्याकडे जनावरे आहेत, मात्र चारा उपलब्ध नाही असे काहीजण संबंधित ठिकाणावरून भाजीपाला भरून नेऊन जनावरांना घालत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com