कांदा साठवणूक मर्यादा हटवा; व्यापाऱ्यांची मागणी

निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे, मात्र आता साठवणूक मर्यादा हटविण्याचा निर्णय घ्यावा. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि व्यापाऱ्यांचे काम सुरळीत होण्यास मदत होईल. - सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या वाढलेल्या दराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर करून त्यापाठोपाठ तातडीने साठवणूक मर्यादा व्यापाऱ्यांवर लादली. मात्र आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी उठविण्याची घोषणा केली असली तरी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने साठवणूक मर्यादा हटविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे.   

जिल्ह्यातील सध्या आवक होणाऱ्या कांद्यापैकी ७० ते ८० टक्के कांदा निर्यातयोग्य आहे. मात्र कांदा खुल्या पद्धतीने माल विक्रीस येत असल्याने मागणीप्रमाणे बाहेर माल पाठविण्यास अडचणी येत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांवर २५० क्विंटल तर किरकोळ व्यापाऱ्यांना २५ क्विंटल कांदा खरेदीची मर्यादा कायम ठेवली आहे. त्यामुळे साठवणूक मर्यादा पाळण्याच्या बाबतीत प्रशासन दैनंदिन खरेदी विक्री, मालाची निकासी व साठवणूक यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे केंद्राच्या अधिसूचनेनुसार निर्यातबंदी १५ मार्चपासून उठणार असली तरी साठवणूक मर्यादा न हटविल्याने बाजारात अपेक्षित उठाव होत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे.

जिल्ह्यातून पुरवठा होत असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यात होळीच्या सणामुळे सध्या मागणी मंदावलेली आहे. तापमान वाढीमुळे कांद्याची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे दर स्थिर असून मंद गतीने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आवक व पुरवठा सुरळीत होण्यासाठी कांदा साठेबाजीसंदर्भात घेतलेला हा निर्णय मागे घेण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे. आखाती देशांसह सिंगापूर, मलेशिया या देशांतील आयातदारांकडून मालाच्या उपलब्धतेबाबत चौकशी होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया

कांदा आवक व व्यापाऱ्यांची संख्या यातील प्रमाण व्यस्त आहे. मात्र सध्या आवक वाढल्याने लिलाव होत आहेत. त्यामुळे खरेदीवर परिणाम नसला तरी साठवणूक मर्यादा आदेशामुळे भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे दैनंदिन माहिती संकलित करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविणे अजूनही अनिवार्य आहेत. त्यामुळे साठवणूक मर्यादा हटवली पाहिजे.  — नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती

खरेदीनंतर हाताळणी व प्रतवारीमध्ये वेळ जातो. साठवणूक मर्यादा कमाल २५ क्विंटल असल्याने ३० टनाच्या ट्रकमध्ये दैनंदिन माल पाठवला जात आहे. त्यामुळे वाहतुक अधिक खर्च होऊन कामकाज अडचणीचे झाले आहे.  - सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com