ऐंशी टक्के साखर निर्यात शक्य

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या साखरेच्या दरवाढीमुळे देशातील कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले आहे. हा वेग पहाता यंदा उद्दिष्टाच्या ८० टक्के साखर निर्यात होऊ शकेल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. याचा सकारात्मक परिणाम शिल्लक साखरेचा साठा कमी होण्यावर होणार आहे. एप्रिलपर्यंत दर वाढण्याची शक्यता असल्याने मार्च व एप्रिल हे दोन महिने कारखान्यांना साखर निर्यातीसाठी सुवर्णसंधी आणणारे ठरणार आहेत.     

केंद्राने देशातील विविध भागांतील ५३० साखर कारखान्यांना यंदा ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा असल्याने याचा फायदा कारखान्यांनी घ्यावा, यासाठी केंद्रानेही द्रुतगतीने पावले उचलत लवचिकपणे बदल केले. काही दिवसांपूर्वी ज्या कारखान्यांनी साखर निर्यात केली नाही. त्या कारखान्यांचा कोटा इतर साखर कारखान्यांना देऊन साखर निर्यात केलेल्या कारखान्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. सहा लाख टनांचा अतिरिक्त कोटा या कारखान्यांना दिला. याचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेशला होणार आहे. उत्तरप्रदेशातील कारखान्यांनी कोट्याइतकी साखर निर्यात केली आहे. महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्यांनी निर्यात केली आहे. त्या कारखान्यांनाही या वाढीव कोट्याचा फायदा होऊ शकेल. 

कोटा वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम होऊन अनेक कारखाने नव्याने करार करण्याच्या तयारीत आहेत. केंद्राने रखडलेले अनुदान तातडीने दिल्यास कारखाने निर्यातीसाठी आणखी जोर लावतील असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. आतापर्यंत देशातील साखर कारखान्यांनी ३५ लाख टन साखरेचे निर्यात करार विविध देशांबरोबर केले आहे. त्यापैकी २३ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. उर्वरित साखर निर्यातीच्या मार्गावर आहे. 

देशातील साखर उत्पादनात वीस टक्के घट ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर देशातील ४५३ साखर कारखान्यांनी १९४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २४९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही घट वीस टक्के इतकी आहे. उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस उत्पादन घटल्यामुळे देशाच्या साखर उत्पादनावरही परिणाम झाल्याचे इस्माने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.   ‘कोरोना’मुळे दरात काहीशी घट आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना विषाणुमुळे सर्वच व्यापाऱ्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. सध्या व्यापारापेक्षा मानवी हानी रोखण्याकडे बहुतांशी देशांचे लक्ष लागले आहे. यामुळे आयात - निर्यातीकडे अनेक देशांचे काहीसे दुर्लक्ष होत असल्याची  माहिती साखर उद्योगाच्या सूत्रांनी दिली. पंधरवड्यापूर्वी ज्या उच्चतम दरामध्ये साखर विकली जात होती. तितका दर सध्या मिळत नसल्याची स्थिती आहे. रोगाची साथ नियंत्रित येण्याची शक्‍यता निर्माण झाल्यास दर पुन्हा वाढतील असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com