नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी अस्वस्थ

परदेशांतून आलेल्या कांद्याला मागणी नाही. देशात फक्त महाराष्ट्रातीलच कांद्याला लोक प्राधान्य देतात. मध्यंतरीच्या काळात काही अपरिपक्व कांदा बाजारात आला, तो घेण्यास व्यापारी धजावत नव्हते. त्यामुळे काहीसे दर खाली आले असले, तरी यापुढील काळातही कांद्याला चांगला दर मिळण्याचा अंदाज आहे.़ - प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला सर्वाधिक वीस हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. सरासरी दर दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल होता. आता मात्र तो दर थेट तीन ते चार हजार रुपये क्विंटलवर आला आहे. शिवाय दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीवर मात करून पीक घेतले असले, तरी दरात चढउतार होत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. मागील काळात काही शेतकरी कांदा पिकामुळे लखपती झाले असले, तरी काही शेतकऱ्यांना मात्र उत्पादनात घट झाल्याने खर्चही निघेना झाला आहे. 

राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यामुळे कांद्यासह सर्वच पिके भुईसपाट झाली. त्यातच दररोज ढगाळ वातावरणाचा परिणाम कांदा पिकावर झाला. त्यामुळे शेतकऱ्‍यांना कांद्यावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागल्याने त्याचा खर्चही पेलवेनासा झाला. ते करूनही कांदा पोसला नाही. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतीमालाची मागणी वाढल्याने त्याचे भाव गगनाला भिडले.

नगरसह राज्याच्या अनेक भागांत अनेक शेतकरी हे लाल कांद्याचे उत्पादन घेतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिरायती शेतात कांद्याची पेरणी करतात, तर बागायती शेतात कांद्याची लागवड केली जाते. त्यासाठी जून-जुलै महिन्यात कांद्याचे रोप टाकले जाते. त्यानंतर एक-दीड महिन्यात रोप लागवड योग्य होते. त्यांतर कांद्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात कांदा पेरणी क्षेत्र कमी असून, लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना जास्त मिळते. त्यावर शेतकऱ्यांना एकरी ४५ ते ५० हजारांवर खर्च झाला. मात्र, यंदा परतीच्या पावसाचे थैमान, त्यात ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. मागील महिन्यात कांद्याला राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत मोठा दर मिळाला. आता मात्र दरात घसरण झाली आहे. दरात सतत चढउतार होत असल्याने शेतकरी मात्र अस्वस्थ आहेत. 

अपरिपक्व कांद्यामुळे भाव पडले कांद्याचे भाव कमी होत आल्याने अनेक शेतकरी अपरिपक्व कांदा बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येत आहेत. असा कांदा लवकर खराब होत असल्याने त्या कांद्याला कमी दर मिळत आहे. कांद्याचे बाजार ४ ते ५ हजार रुपयांवर स्थिर राहणार असून, शेतकऱ्यांनी घाई न करता परिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन यावा, असे बाजार समित्यांकडून सांगितले जात आहे.    नगर बाजारसमितीत कांद्याला सध्या मिळत असलेला दर (क्विंटल) व मागील महिन्यातील दर 

  • नंबर १ ः  ३९०० ते ४५०० (१३,००० ते १६,०००)
  • नंबर २ ः२६०० ते ३८०० (८००० ते १३,०००)
  • नंबर ३ ः १४०० ते २५०० (४००० ते ७०००) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com