चीनला द्राक्ष निर्यात सुरू

द्राक्ष निर्यातीवर ‘कोरोना’चा कुठलाही परिणाम नाही. मुळात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बागांना बसल्याने दर्जेदार माल तयार होण्यास विलंब झाला. त्यामुळे चीनला द्राक्ष निर्यात सुरू होण्यास विलंब झाला. सध्या चीनमधून द्राक्षाची मागणी वाढत असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा निर्यात अधिक होईल, असा अंदाज आहे. — संजय राऊत, द्राक्ष निर्यातदार
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाल्याने चीनला होणारी निर्यातही उशिरा सुरू झाली. चीनमधून भारतीय द्राक्षाला मागणी वाढली आहे. सांगलीतून सध्या एक कंटनेर चीनला रवाना झाला असून, द्राक्षाला प्रतिकिलोस ८० ते १२० रुपये दर मिळाला. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यात अधिक होईल; तसेच, ‘कोरोना’चा द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दरवर्षी आगाप छाटणी घेतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष बाजारपेठेत येतात. दरवर्षी क्रिसमसला चीनचे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी सांगलीची द्राक्ष बाजारपेठेत जातात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी छाटणी नियोजन करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतात. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महापूर आणि त्यानंतर अतिवृष्टीचा फटका आगाप छाटणी घेतलेल्या बागांना बसला. त्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यामुळे छाटणी वेळापत्रक पुढे गेले.

परिणामी जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत आली खरी; परंतु बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे द्राक्षाची चीनला निर्यात होऊ शकली नाही. त्यामुळे कोरोनाचा फटका चीनच्या निर्यातीवर बसला, अशी चर्चा सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत होते. चीनला द्राक्षाची निर्यात सुरू होणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता.  गेल्या वर्षी हंगाम वेळेत सुरू झाला होता. २३ एप्रिलपर्यंत निर्यातीचा हंगाम सुरू राहिला होता. त्यामुळे सांगलीतून चीनला ५१ कंटनेर म्हणजे ३३.४६ टन निर्यात झाली होती. 

द्राक्षाला पोषक वातावरण गेल्या चार ते पाच दिवसांपासून द्राक्षाला पोषक असे वातावरण निर्माण झाले असून द्राक्षाचा आकार आणि गोडी देखील वाढू लागली आहे. यामुळे चीनमधून द्राक्षाची मागणी वाढू लागली आहे. सध्या गतवर्षीपेक्षा चालू वर्षाच्या सुरुवातीलाच प्रतिकिलोस १० रुपयांनी दरात वाढ झाली असून ८० ते १२० रुपये दर मिळत आहेत. येणाऱ्या काळात दरात आणखी वाढ होईल. त्यातच यंदा हंगाम उशिरा सुरूर झाल्याने एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  उशिरा घेतलेल्या फळछाटणी झालेली द्राक्ष चीनला निर्यात करण्याची मोठी संधी आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष निर्यातीसाठी पोषक आहे, असे कृषी अधिकारी  (निर्यात) डी. एस. शिलेदार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com