नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाल्याने बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली. परिणामी, शेतीमालाचे दर वाढले आहेत. यावर पर्याय म्हणून शेतीमालाची आवकवाढ व दर नियंत्रित व्हावे याकरिता राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शनिवार व रविवार तसेच बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुट्यांच्या दिवशीही सुरू ठेवावे, असे आदेश पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी लेखी पत्राद्वारे रविवारी (ता. ८) दिले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनी या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखवल्याचे पाहायला मिळाले.
पणन संचालनालयाने दिलेल्या आदेशान्वये, राज्यात ज्या बाजार समित्यांमध्ये कांदा, टोमॅटो व बटाट्याची आवक होते. अशा बाजार समित्यांमध्ये शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पणन संचालनालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावेत व त्याची कार्यवाही व्हावी असे सांगण्यात आले होते.
मात्र, जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बाजार समित्यांनी शनिवार (ता. १४) व रविवार (ता. १५) कामकाज बंद ठेवले. केवळ प्रशासकीय कामकाज सुरू ठेऊन प्रत्यक्ष शेतमालाचे व्यवहार सुरू न ठेवता कामकाज सुरू असल्याचे भासवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. जिल्ह्यात लासलगाव येथे शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) कामकाज बंद होते, मात्र शनिवारी विंचूर उपबाजारात कांद्याचे लिलाव झाले. देवळा व उमराणे बाजार समितीमध्ये शनिवार व रविवार रोजी कामकाज सुरू राहिले मात्र शेतकरी शेतीमाल घेऊन न आल्याने लिलाव झाले नाहीत.
पिंपळगाव बसवंत, मनमाड, नामपूर येथे शनिवार बाजार समितीचे कामकाज सुरू होते. मात्र रविवार ते बंद राहिले. चांदवड व येवला बाजार समितीचे कामकाज शनिवार व रविवारी झाले. याठिकाणी कांदा लिलाव पार पडले, असे येवला बाजार समितीचे सचिव श्री. व्यापारे यांनी सांगितले. उमराणे व देवळा बाजार समितीचे कामकाज सुरू होते, मात्र आवक नसल्याने लिलाव बंद राहिले असे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.