सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार कोण?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली शेतातील ऊसही चरख्यात गेला. गाळप हंगाम सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले मात्र, तरीही अद्याप कोणत्याही कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. ऊसदराची कोंडी अजूनही कोणत्याच कारखान्याने फोडली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.     मॉन्सूनोत्तर पावसामुळे ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास तब्बल एक महिना उशीर झाला आहे. परिणामी अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळित झाली असून ऊस तोड मजूर येण्यास उशिरा झाला. जसजसे ऊस तोडणी मजूर येतील तसा गाळपास वेग येऊ लागला आहे.  मात्र, अद्यापही गाळप अपेक्षित प्रमाणात झालेले नाही. गाळपाची गती वाढविण्यासाठी कारखान्यांकडून सुरुवातीपासून हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. सध्या अनेक कारखान्यांचे गाळप सुरू होऊन १५ पेक्षा अधिक दिवस होऊन गेले असले तरी पहिला हप्ता किती, कधी देणार याबाबत मौन पाळले गेले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत प्रतिटनास एफआरपी अधिक २०० रुपये तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटनास चार हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. महापुरामुळे कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी अगोदर हवालदिल झाले असतानाही ऊस दराबाबत साखर कारखान्यांकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी आहे.

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले असल्याने लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी बहुतांशी शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. आंदोलन होत नसल्यामुळे प्रशासनाकडून ऊस दरासाठी बैठक घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ऊस तुटल्यावर पहिला हप्ता १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. मात्र, अनेक कारखान्यांनी गाळप सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरी दर जाहीर न करताच ऊस तोडणी सुरू ठेवली आहे. अनेक कारखान्यांकडून साखरपोती पूजनही केले गेले आहे. मात्र, दराबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येते. शेजारील कारखाने किती दर देतात? यानंतर आपला दर जाहीर करू, अशी अनेक कारखान्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.     ऊसदराकडे शेतकऱ्यांचे लक्ष राज्यातील सुमारे ८० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, अजून कोणत्याच कारखान्याने उसाला पहिला हप्ता किती? व कधी देणार? याबाबत भूमिका घेतलेली नाही. केंद्र सरकारने साखरेला किमान विक्री मूल्य ३१०० रुपये क्विंटल जाहीर केले असल्याने बहुतांशी कारखान्यांना ‘स्वाभिमानी’ने मागणी केलेला दर देणे शक्य असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्याही साखर कारखान्यांकडून दर जाहीर केला गेलेला नाही. यामुळे कोणता कारखाना दराची कोंडी फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com