‘कोरोना’मुळे चीनमधील सूत, कापूस निर्यात थांबली

देशात सीसीआयने यंदा कापसाची मोठी खरेदी केल्याने बाजाराचे भवितव्य सीसीआयच्या भूमिकेवरही आहे. बाजार स्थिर आहे. परंतु चीनमधील कापूस, सूत निर्यात कोरोना विषाणू समस्येमुळे ठप्प आहे. चीनशी गाठींचे सौदे झाले आहेत. परंतु, पाठवणूक बंद अवस्थेत आहे. यामुळे बाजार काहीसा नरमला आहे. - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव ः चीनमध्ये कोरोना विषाणूचा धोका दिवसागणिक वाढत असल्याने मागील आठवडाभरापासून चीनला भारतातून होणारी सूत व कापसाची निर्यात थांबली आहे. यातच देशात शासकीय कापूस खरेदी बऱ्यापैकी झाल्याने बाजारातील दबाव दूर झाला असून, इतर देशांमधून सुताला चांगला उठाव असल्याने सुताचा कुठलाही साठा देशात शिल्लक नाही. भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कोणत्या दरात कापूस गाठींची विक्री करेल, यावरच बाजाराची चाल अवलंबून असल्याची स्थिती आहे. 

भारतीय बाजारात खंडीचे (३५६ किलो रुई) दर ४० हजार रुपयांपर्यंत आहेत. हे दर मागील दोन महिन्यांपासून स्थिर आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला चीनमधील कापूस निर्यातीने वेग घेतला होता. देशातून यंदा ६० ते ६५ लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज आहे. यात सुमारे सात लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली. अमेरिका व चीनमधील व्यापार युद्ध सुरूच असल्याने चीनने भारतासह ऑस्ट्रेलियाशी गाठींच्या खरेदीचे आणखी सौदे केले होते. परंतु, मागील आठ ते १० दिवसांत चीनमधील कोरोना विषाणूची समस्या तीव्र झाली आहे. तेथे या समस्येवर मात करता न आल्याने व्यापारही थांबला आहे. त्यात गाठी, सूत आयातीवरही परिणाम झाला आहे.

चीनमधील कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जिझियांग व इतर भागात कामकाज थांबल्यागत स्थिती आहे. सूत आयातीवरही चीनने यंदा भर दिला होता. तेथील निर्यात थांबल्याची स्थिती असली तरी व्हिएतनाम, बांगलादेश व युरोपातील सूत निर्यात गतीने सुरू असल्याने देशात सुताचा कुठलाही साठा नाही. मागील हंगामात सुताचा मोठा साठा राहिल्याने गिरण्यांना तोटा झाला. यंदा मात्र सूत निर्यात व्यवस्थित सुरू असल्याने व उचल चांगली झाल्याने दर टिकून आहेत. २० काउंटच्या सुताचे दर प्रतिकिलो १६५ रुपये, ३० काउंटच्या सुताला १८० रुपये तर ४० काउंटच्या सुताला २०० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. सुताचे सौदे यापूर्वीच झाल्याने गिरण्यांमधील प्रक्रिया वेगात सुरू आहे. 

‘सीसीआय’ची खरेदी वेगात ‘सीसीआय’ने देशात विविध राज्यांमध्ये मिळून ६० लाख गाठींच्या कापसाची खरेदी केली आहे. खरेदी अजून सुरूच आहे. २०१२-१३ मध्ये सीसीआय किंवा शासकीय यंत्रणांनी ९० लाख गाठींच्या कापसाची शेतकऱ्यांकडून विविध राज्यांमध्ये खरेदी केली होती. यानंतर यंदा मोठी खरेदी शासकीय यंत्रणांनी केल्याने बाजारातील दरांबाबतचा दबाव दूर झाला आहे. सीसीआय कोणत्या दरात कापूस, सरकीचे सौदे करील, यावरही बाजाराची चाल अवलंबून आहे. सध्या बाजारात दर्जेदार कापसाचे दर ५१०० ते ५२०० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. 

देशातून २२ लाख गाठींची मागील महिन्याच्या मध्यापर्यंत निर्यात झाली आहे. बांगलादेशात यंदा कापूस गाठींची निर्यात वाढू शकते, असा अंदाज आहे. तेथे सुमारे २५ ते ३० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच देशात उत्तरेकडील कापडमिल्स सुरू झाल्या आहेत. तेथे सुताची मागणी आहे. देशात ३६० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन होईल, असा अंदाज आहे. मागील हंगामातील सुमारे २८ लाख गाठी शिल्लक आहेत. तर २० ते २५ लाख गाठींची आयात देशात होईल. देशातील मिल्स, लघुउद्योगाला सुमारे ३५० ते ३६० लाख गाठींची गरज आहे. यामुळे बाजारात सुतासह गाठींची उचल सुरू आहे. यामुळे चीनमधील निर्यात रखडत सुरू राहिली तरी देशांतर्गत बाजारात कापूस दरांवर दबाव येणार नसल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. 

देशातून सुताची निर्यात व्हिएतनाम, बांगलादेश, युरोपात वेगात सुरू आहे. मागील वर्षी सूतगिरण्यांना सुताची हवी तशी उचल नसल्याने फटका बसला. यंदा मात्र उचल चांगली असल्याने गिरण्या नफ्यात आहेत. देशात कुठेही सुताचा अपवाद वगळता साठा नाही. चीनमधील मागणी मात्र मागील पाच ते सहा दिवसांत कमी झाली आहे, अशी माहिती मालेगाव (जि. नाशिक) येथील सूतगिरणी संचालक  महेश पाटोदिया यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com