साताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंत्रांच्या अनुदानासाठी मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. जिल्ह्यात या आर्थिक वर्षात १५ हजार ३२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, आतापर्यंत त्यातील अवघ्या एक हजार ५२ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १२ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून उर्वरित दोन महिन्यांत किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

मजुरांवर उपाय म्हणून शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढला आहे. यामुळे राज्य शासन ट्रॅक्टर, पॅावर टिलर आदी अवजारांचा अनुदानावर पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवते. यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. योजनेसाठी १५ हजार ६२४ अर्ज प्राप्त झाले होते. लॅाटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पूर्वसमंती दिली. उपलब्ध अर्जांपैकी २६६१ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली. आजपर्यंत यातील एक हजार ५२ शेतकऱ्यांना पाच कोटी आठ लाखांचे अनुदान दिल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पूर्वसंमती दिल्यानंतर साधारणपणे एक महिन्याचा कालावधी यंत्र खरेदी करण्यासाठी दिला जातो. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे यंदा मोठा कालावधी वाया गेल्याने या योजनेला ब्रेक लागला होता. एक एप्रिल ते ३१ मार्च असा आर्थिक वर्षाचा निकष धरल्यास अजूनही अर्ज केलेले १२ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

उर्वरित कालावधी पहाता अर्ज केलेल्या ५० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळणे शक्य होणार नसल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत. यामुळे प्रतीक्षा करून हाती काहीच लागणार नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मजुर समस्येमुळे यांत्रिकीकरणाचा अवलंब करा असा गाजावाजा केला जातो. मात्र, बहुसंख्य शेतकरी अर्ज करून कालावधीअभावी वंचित रहात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.    शिल्लक अर्जांना प्राधान्य देण्याची मागणी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणातील विविध योजनांसाठीचे अर्ज एक वर्षाकरिता ग्राह्य धरले जातात. अर्जाची मागणी केल्यानंतर त्याची लॅाटरी काढून नंबर लावले जातात. त्यानंतर टप्पाटप्याने (निधी प्राप्त होईल) तसतशी संमतीपत्रे देऊन अवजारे खरेदीनंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते.

अनेक शेतकरी प्रत्येकवर्षी या योजनेसाठी अर्ज करतात. मात्र, लॅाटरी काढून उशिरा नंबर येत असल्याने या शेतकऱ्यांना पर्वसमंती मिळत नाही. परिणामी, योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. यासाठी शिल्लक अर्ज पुढील वर्षात प्राधान्याने ग्राह्य धरावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com