पीएम किसान योजना ः पाच कोटी शेतकरी तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली  : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान योजनेंतर्गत देशातील सुमारे पाच कोटी शेतकरी अद्यापही तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय कृषी विभागाकडे माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. वर्षाला तीन हप्त्यांत ६००० रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकार या योजनेंतर्गत देणार आहे.  

लोकसभा निवडणूकपूर्व जाहीर झालेली पीएम किसान योजना देशात १ डिसेंबर २०१८ पासून लागू झाली. दर चार महिन्यानंतर २००० रुपये शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार देशातील सुमारे २.५१ कोटी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता आणि ५.१६  कोटी शेतकऱ्यांना योजनेंतर्गत तिसरा हप्ता अजून प्रलंबित आहे. डिसेंबर २०१८- नोव्हेंबर २०१९ या कालावधीत योजनेंतर्गत सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ७.९२ कोटी अर्थात ८४ टक्के शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. ६.५ कोटी शेतकऱ्यांना दुसरा, तर ३.८५ कोटी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाल्याचे या माहितीत समोर आले आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने डिसेंबर २०१८ आणि मार्च २०१९ दरम्यान ४.७४ कोटी शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४.२२ कोटी शेतकऱ्यांना पहिला, ४.०२ कोटी शेतकऱ्यांना दुसरा आणि ३.८५ कोटी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला आहे. मात्र ५० लाख, ७० लाख आणि ९० लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता का मिळाला नाही याबाबतीची माहिती कृषी मंत्रालयाने दिली नाही. 

पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात या योजनेंतर्गत कोणतीही नोंदणी झाली नाही, त्यामुळे या काळात तिकडे कोणत्याही निधीचे वितरण झाले नाही. गेल्या वर्षी एप्रिल आणि जुलै महिन्यात ३.०८ कोटी शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली, यापैकी २.६६ आणि २.४७ कोटी लाभार्थ्यांना अनुक्रमे पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला. मात्र, या माहितीत ४० लाख आणि ६१ लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांना अनुक्रमे पहिला आणि दुसरा हप्ता का मिळाला नाही, या बाबींचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. 

‘‘नोंदणीकृत शेतकरी योजनेंतर्गत ठरलेल्या हप्त्यांचा लाभार्थी असेल, त्यानुसार एप्रिल २०१९-जुलै २०१९ दरम्यान नोंदणीकृत लाभार्थ्यांकरिताचा तिसरा हप्ता प्रलंबित नाही. या कालखंडात पश्‍चिम बंगाल, पंजाब आणि चंडीगडमधील कोणताही नोंदणीकृत लाभार्थी नसल्याने त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता देण्यात आला नाही,’’ असे कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

ऑगस्ट २०१९ ते ३० नोव्हेंबरमध्ये २०१९ दरम्यान १.१९ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, यापैकी ७३.६६ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. मात्र, यापैकी ४५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याबाबत या माहितीत उल्लेख नव्हता. ‘‘नोंदणीकृत शेतकरी योजनेंतर्गत ठरलेल्या हप्त्यांचा लाभार्थी असेल, त्यानुसार ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचा दुसरा आणि तिसरा हप्ता प्रलंबित नाही,’’ असे या माहितीत म्हटले आहे. योजनेच्या अंमलबजावणीस पश्‍चिम बंगाल सरकारने नकार दिल्यामुळे या राज्यातून कोणाचीही नोंद लाभार्थी म्हणून झालेली नाही. 

संकेतस्थळानुसार ८.८२ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पंतप्रधान किसान सन्मान निधी किंवा पीएम किसान अंतर्गत देशभरात राज्यनिहाय नोंदणीकृत शेतकरी संख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या निधीची माहिती देण्याची मागणी २६ डिसेंबर २०१९ रोजी पत्राद्वारे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारात करण्यात आली होती. १ डिसेंबर २०१८ पासून पीएम किसान या कायमस्वरूपी योजनेस प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी योजनेसाठीची लाभार्थी शेतकऱ्यांची बिनचूक आणि खात्रीपूर्ण माहिती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर आर्थिक लाभ थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा करण्यात येतो, असे माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांची बँकेसह विविध पातळीवर खात्री केल्यानंतरच यासंदर्भातील निधी त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतो. याकरिताच्या अधिक माहितीसाठी www.pmkisan.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असे म्हटले आहे. संकेतस्थळावर ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत दिलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे ८.८२ कोटी शेतकऱ्यांची योजनेंतर्गत नोंदणी झाली असून ८.४१ कोटी शेतकऱ्यांना पहिला, ७.५६ कोटी शेतकऱ्यांना दुसरा, ६.१९ कोटी शेतकऱ्यांना तिसरा आणि ३.०३ कोटी शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळाला आहे.   

महाराष्ट्रात ४२ लाखांवर नोंदणी आसाममध्ये १६.९७ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी १४.०२ लाख शेतकऱ्यांना पहिला, १३.७२ लाख शेतकऱ्यांना दुसरा आणि ९.८७ लाख शेतकऱ्यांना तिसरा हप्ता प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर म्हटले आहे. महाराष्ट्रात ४२.३४ लाख शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली असून ३६.९८ लाश शेतकऱ्यांना पहिला, ३१.५३ लाख शेतकऱ्यांना दुसरा आणि २७.६७ लाख शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला आहे. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान केरळात २६.१३ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून यापैकी २३.८३ लाख शेतकऱ्यांना पहिला, १८.७९ शेतकऱ्यांना दुसरा आणि १८.४३ लाख शेतकऱ्यांना तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे.

उत्तर प्रदेशात १९.६४ पैकी ९.५७ लाख, तर गुजरातमध्ये १.९८ लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी १.२२ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. मध्य प्रदेशात १७.१८ लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी ९.७८ लाख, ओडिशात ५.६ लाखांपैकी ५ हजार ५०७  लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. सिक्कीममधील नोंदणीकृत ७ हजार ३२६ शेतकऱ्यांपैकी कोणलाही पहिला हप्ता देण्यात आलेला नाही, तर दिल्लीत १७३४ शेतकऱ्यांपैकी १४४७ शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे.

पीएम किसान योजना दृष्टिक्षेपात...

  • योजना प्रारंभ : १ डिसेंबर २०१८
  • योजना लाभ : प्रति शेतकरी वार्षिक ६००० रुपये 
  • नोंदणी कालावधी : डिसेंबर २०१८- नोव्हेंबर २०१९
  • एकूण नोंदणीकृत शेतकरी : ९ कोटी
  • पहिला हप्ता प्राप्त शेतकरी : ७.९२ कोटी
  • दुसरा हप्ता प्राप्त शेतकरी : ६.५ कोटी
  • तिसरा हप्ता प्राप्त शेतकरी : ३.८५ कोटी
  • योजना स्वीकारली नाही : पश्‍चिम बंगाल
  •      (स्रोत : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com