रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोर

रत्नागिरीजिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार वाऱ्या‍सह पडलेल्या मुसळधार पावसाने रविवारी (ता. ५) सकाळी विश्रांती घेतली. जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुनासह काजळी नदीची पाणीपातळी स्थिर झाली.
कारवांचीवाडी येथील गंगाराम कळंबटे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले.
कारवांचीवाडी येथील गंगाराम कळंबटे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले.

रत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार वाऱ्या‍सह पडलेल्या मुसळधार पावसाने रविवारी (ता. ५) सकाळी विश्रांती घेतली. जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुनासह काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र पावसाचा जोर ओसरला आणि पाणीपातळी स्थिर झाली. मंडणगड ते वेळास मार्गावर दरड कोसळली; तर चिपळूण खेर्डी परिसरात दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

रविवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड येथे २५३, दापोली येथे १८७, खेड येथे १४०, गुहागरमध्ये १०३, चिपळूणमध्ये १७२, संगमेश्‍वरमध्ये ११६, रत्नागिरीत ४९, लांजा येथे १०५; तर राजापूरमध्ये १३५ मिमी. पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यातील भारजा, निवळी या नद्या तुडुंब भरून वाहत आहे. उमरोली-शिपोशी मार्गावर तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद ठेवण्यात आला. चिपळूणमध्ये परशुराम नगरात पावसाचे पाणी साचून ते घरांमध्ये शिरल्याने दहा घरे बाधित झाली आहेत. राजापुरात अर्जुना नदी दुथडी भरून वाहत आहे. वरचीपेठ भागाकडे जाणारा चिंचबांध रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे त्या मार्गावरून शीळ, गोठणे दोनीवडे आदी भागांत जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. 

दरम्यान, सायंकाळीही पावसाचा जोर कायम असल्याने अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रत्नागिरीतील काजळी नदीचे पाणी वाढले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे; तसेच केळे मजगाव येथील पवारवाडी, म्हामुरवाडी येथे शिळ धरणातील पाणी रस्त्यावर आले. केळे गावाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. संगमेश्‍वर तालुक्यातील सोनवी, बावनदी, असावी, शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या भातशेतीत पाणी घुसले होते. काही ठिकाणी नदीचे प्रवाहही बदलत आहेत. नदीकाठच्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिल्याने भात लागवडीचा जोर वाढला आहे.

रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली. कारवांचीवाडी येथे झाड पडून घराचे आणि जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. गंगाराम कळंबटे यांच्या घरावर; तर राजेंद्र कांबळे यांच्या गोठ्यावर मोठे आंब्याचे झाड पडले. यात त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीजवाहिनीवर झाड पडल्याने या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला. रविवारी सकाळी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. सूर्यदर्शन झाल्यामुळे रखडलेली भातशेतीची कामे पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत.   पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका शनिवारी दिवसभर धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास जगबुडी व नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदी सभोवतालची भातशेती पुराच्या पाण्यात अडकली. खेड तालुक्यातील चाकाळे येथील शेतकरी चाकाळे व चिंचघर दरम्यानच्या खलाटीत भात लागवडीसाठी गेले होते. अचानक पावसाचा जोर वाढून भातशेती पाण्याखाली गेली.

भात लागवडीसाठी गेलेले चाकाळे येथील ४० हून अधिक शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शेतकरी घरी न परतल्याने ग्रामस्थांनी खलाटीत धाव घेतली. सर्व शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर धावाधाव सुरू झाली. स्थानिक तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मानवी साखळी तयार केली आणि सर्व शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये महिलांचाही समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com