सातारा जिल्ह्यातील रब्बी पिके धोक्‍यात

मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने फवारण्या कराव्या लागणार आहेत. वातावरणात बदल नाही झाला तर हातचे पीक जाण्याची शक्यता आहे. - अनिल गायकवाड, इंदोली, ता. कऱ्हाड, जि. सातारा
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : खरिपात अतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील पिकांबाबत शेतकरी आशावादी होते. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे रब्बीतील पिके धोक्‍यात आली आहेत. दमदार आलेली पिके पदरात पडतील की नाहीत, या विवंचनेत शेतकरीवर्ग दिसून येत आहे. 

जिल्ह्यात खरिपातील पिके काढणीला आलेली असतानाच मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली गेली होती. परिणामी पिके कुजणे, काळी पडणे यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अगोदर महापूर व अतिपावसाने शेतकरी अडचणीत आले होते. या संकटातून बाहेर पडत शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांच्या कामांना प्रारंभ केला होता. परतीच्या पावसाची शेतजमिनीत ओल टिकल्याने रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांची दमदार उगवण झाली होती. दुष्काळग्रस्त तालुक्यांसह सर्वच ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सरीवर लागवड केली. पिकांच्या दमदार वाढीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल अशी आशा होती.

मात्र, जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने या पिकांवर किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता रब्बी ज्वारीवर दिसू लागला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागाकडून उपाय सुचविले जात आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांवर आणखी संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहे. यामध्ये प्रमुख पिक असलेल्या ज्वारी, हरभरा व गहू पिकांचीही ७५ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. गहू पिकास थंडी फायदेशीर असते, मात्र थंडी गायब झाल्याने गहू पिक संकटात सापडणार आहे. पहाटे धुके व सकाळपासून ढगाळ वातावरण होत आहे. यामुळे हरभऱ्यावर घाटेअळी व गहू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. वांगे, टोमॅटो, कोबी, वाटाणा, पावटा या तरकारी पिकांनाही या ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी फवारण्यांवर भर देत असल्याने उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. कांद्यावरही  पुन्हा किड -रोगांचे संकट घोंगावत आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com