केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कांदा आयात केला : राजू शेट्टी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः शेतकऱ्यांना पैसे मिळावेत असे केंद्र सरकारला कधीच वाटत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की परदेशातून कांदा आयात करायचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेल्या सरकारने शेतीची पुरती वाट लावली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.  

हमीदराबाबतही सरकारने कधी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच आम्हाला पीकनिहाय आंदोलन करावे लागत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार नक्की सातबारावरील सर्व कर्ज माफ करेल, अशी आशा व्यक्त केली. नगर येथे संघटनात्मक कामासाठी आलेल्या शेट्टी यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नवीन पदाधिकारी निवडी केल्या जात असून राज्यभर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. देशात बहुतांश कुटुंबांचा व्यवसाय शेती आहे. मात्र, केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे चांगले व्हावे, शेतमालातून त्यांना पैसे मिळावेत, असे कधीच वाटले नाही. खरंच लोकांच्या हितासाठी कांदा आयात करायचा होता तर तो कांद्याचे दर सर्वाधिक झाल्यावरच आयात करायला हवा होता.

मुळात पावसाच्या नुकसानीतून साधारण वीस ते तीस टक्केच कांदा वाचला आहे. आता राज्यासह अन्य राज्यात पावसाळी कांदा बाजारात आल्यानंतर आयातीचा सरकारने निर्णय घेतला. यामुळे हे सरकार किती शेतकरीविरोधी आहे, याचा प्रत्यय देशाला येत आहे. राज्यात संपूर्ण कर्जमाफीची मागणी आहे. या सरकारकडून आता संपूर्ण कर्ज आणि थकीत वीजबिले माफ व्हावीत आणि भविष्यात शेतीला परवडतील अशा दराने वीज मिळावी हीच आमची मागणी आहे.

आम्ही महाआघाडीच्या नेत्यांसोबत याच विषयावर सतत चर्चा करत आहोत. हे सरकार नक्की कर्जमाफी करेल. त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. खरं तर विरोधी पक्षाने सभागृहात आवाज उठवून संपूर्ण कर्जमाफी करून घ्यायला हवी होती. मात्र, त्यांची तशी मानसिकता नाही. ते दुसऱ्याच विषयावर बोलत आहेत. 

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हेच भाजपचा चेहरा होते. मागील पाच वर्षात त्यांच्यामुळे आम्ही भाजपा-सेना आघाडीसोबत होतो. आम्ही नाराज होताच पंकजा मुंडेंच्या माध्यमातून आम्हाला थांबवून घेतले. मात्र भाजपला तळागाळातून आलेले लोक चालत नाहीत. सध्याची परिस्थिती पाहिली तर मोदी, शहा वगळता सर्वांचेच भाजपमध्ये शोषण होत आहे. आपलेच साम्राज्य आता कायम राहील या भ्रमात भाजपचे लोक होते. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. वेगवेगळ्या विचाराचे पक्ष महाआघाडीत एकत्र आले असले तरी भाजपला रोखण्यासाठी ही आघाडी टिकवावी लागेल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com