वन्यप्राण्यांच्या भीतीने निवी, कसणी भागातील शिवारे पेरणीविना पडून

फक्त सातबारा उताऱ्यावरच जमीनदार असलेल्या शेतकऱ्यांवर मोलमजुरीची वेळ आली आहे. डोंगरी भागातील शेती आणि शेतकरी वाचवायचा असेल तर जंगलाला संरक्षक कुंपण, प्रत्येक शेतकरी कुटुंबास दरमहा निर्वाह भत्ता किंवा या गावांचे विकसनशील पुनर्वसन यापैकी एक पर्याय शासनाला तातडीने निवडावा लागेल. - मारुती उर्फ बाळू पाटील, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, निवी.
निवी, कसणी परिसरातील शिवारे पेरणीविना पडीक आहेत
निवी, कसणी परिसरातील शिवारे पेरणीविना पडीक आहेत

ढेबेवाडी, जि. सातारा   : वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेल्या निवी, कसणी (ता. पाटण) परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीवरील लक्ष कमी केल्याने प्रतिवर्षी तेथील पिकाखालील क्षेत्र घटत चालले आहे. सध्याच्या रब्बी हंगामातही त्याचा प्रत्यय येत असून खरिपाच्या काढणीनंतर मोकळी पडलेली तेथील अनेक शिवारे सद्यःस्थितीत पेरणीविना पडूनच आहेत.

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील निवी, कसणी, निगडे, घोटीलसह वाड्यावस्त्यांलगत घनदाट जंगल आहे. वन्यप्राण्यांमुळे हानी पोहचू नये, म्हणून काही वर्षांपूर्वी अगदीच जंगलालगतची लोकवस्ती हलविण्यात आली असली तरी अन्य शिल्लक गावांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राण्यांनी त्या गावातील शिवारांकडे मोर्चा वळविल्याने शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे. निवी, कसणी परिसरात शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबविल्याने पूर्वी हंगामात रात्रंदिवस धगधगणारी गुऱ्हाळघरे विझली आहेत. रानडुक्करे आणि गव्यांचे कळप तोंडचा घास हिरावून घेत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकून पोटापाण्यासाठी मुंबई गाठली असून गावाकडीलही अनेक महिला-पुरुष शेतमजूर म्हणून ढेबेवाडी परिसरात दुसऱ्यांच्या शिवारातून राबताना दिसत आहेत.

या सर्वाचा परिणाम डोंगरातील पिकाखालील क्षेत्रावर झाला असून पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात वन्य प्राण्यांसह अतिवृष्टीने डोंगर कपारीतील शेतकऱ्यांची धरलेली पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी सर्व भिस्त रब्बी हंगामावर ठेवतील आणि ते क्षेत्र वाढेल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला आहे. 

खरिपाच्या काढणीनंतर मोकळी पडलेली तेथील अनेक शिवारे सद्यस्थितीला पेरणीविना पडून आहेत. डोंगरी भागातील शेतकरी रब्बीत हरबरा, गहू, खपली, तूर, मसुरा, पावटा तसेच वांगी, कांदे आदी पिके घेतात. यावर्षी मात्र अनेकांनी शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसते आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव आणि प्रादेशिक वनविभागाच्या कक्षेत हा परिसर समाविष्ट होतो. नुकसानीनंतर पंचनाम्याचे सोपस्कार करून संबंधितांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या भरपाईबद्दल शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. भविष्यात हे असेच सुरू राहिले तर डोंगरी भागातील शेतीच संपून जाईल अशीही भीती व्यक्त होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com