सोलापुरातून पुण्यात होणारा ७०० टन शेतीमालाचा पुरवठा ठप्प 

सध्या माझ्याकडे एक एकरवर काकडी आहे. एक-दोन दिवसाआड माल काढतो आणि पुणे बाजार समितीत पाठवतो. सध्या १८ रुपये प्रतिकिलो दर आहे. पण लॉकडाउनमुळे पुणे बंद असल्याने अडचण निर्माण झाली आहे. एका तोड्याला एक टन काकडी बाजारात जातेय, पण आता बंदमुळे साधारण एका दिवसाचे १८ हजारांचे नुकसान होणार आहे. स्थानिक पंढरपुरात एवढ्या प्रमाणात काकडीची विक्री होणे शक्‍य नाही. - धनंजय देठे, शेतकरी, धोंडेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.
सोलापुरातील शेतकऱ्यांकडे शेतीमाल बाजारात पाठवण्यासाठी तयार आहे. परंतु, लाॅकडाउनमुळे विक्रीबाबत अडचणी आहेत.
सोलापुरातील शेतकऱ्यांकडे शेतीमाल बाजारात पाठवण्यासाठी तयार आहे. परंतु, लाॅकडाउनमुळे विक्रीबाबत अडचणी आहेत.

सोलापूर  ः ‘कोरोना’मुळे पुण्यात पुन्हा लॉकडाउन जारी करण्यात आल्याने पुणे बाजार समितीचे व्यवहार बंद आहेत. परिणामी, सोलापूर जिल्ह्यातून पुणे बाजार समितीत होणारी फळे आणि भाजीपाल्याची सर्व आवक थांबली. जिल्ह्यातून पुण्याला रोज सुमारे ७०० टनांहून अधिक फळे आणि भाज्यांचा पुरवठा होतो. हा सर्व पुरवठा थांबल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केवळ शेतमालाचे नुकसान नाहीच, तर यावर आधारित शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडून जाणार आहे.  

‘कोरोना’मुळे गत तीन महिन्यांपुर्वी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या सर्वाधिक झळा शेतकऱ्यांना बसल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहिर झाल्याने त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर झाला आहे. सोलापूरला पुणे हे शेतीमाल वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे साहजिकच, सोलापूर जिल्ह्यातून भाजीपाला आणि फळांची मोठी आवक पुणे बाजार समितीत होते. 

पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा, माढा, टेंभूर्णी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी ही भाजीपाला आणि फळांची महत्वाची केंद्रे आहेत. या भागातून दोडका, कारली, ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, वांगी, कोबी या भाजीपाल्यासह डाळिंब, केळी, पेरु या फळांची मोठी आवक पुण्यात होत असते. प्रतिदिन एका तालुक्‍यातून ८ ते १० गाड्यांपेक्षाही अधिक गाड्या पुण्याकडे जातात. सरासरी ७० गाड्या एका तालुक्‍यातून धरल्यास अकरा तालुक्यांमधून सरासरी ७० टन आणि संपूर्ण जिल्ह्यातून रोज सुमारे ७०० टनापर्यंत भाजीपाला आणि फळांचा पुरवठा पुण्याला होतो. पण आता दहा दिवस हा सर्व पुरवठा थांबणार आहे. आता एवढा शेतीमा माल विकायचा कुठे असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. 

सोलापुरातही लॉकडाऊन  पुण्यानंतर आजपासून (ता.१६) सोलापुरातही दहा दिवसांचा लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर या महत्वाच्या बाजारपेठांना एकाचवेळी शेतकरी मुकणार आहे. या आधीच्या लॉकडाउनमध्ये बाजार बंदमुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. आता पुन्हा एकदा त्याची झळ बसणार आहे.    माझ्याकडे रंगीत ढोबळी मिरचीचा पाऊण एकरचा प्लॉट आहे. हा सर्व माल पुण्यात पाठवतो आहे, पंधरवड्यापूर्वी १०० रुपयांपुढे असणारा दर, गेल्या काही दिवसांत ५० रुपयांवर आला आहे. त्यात आता पुन्हा लॉकडाउनमुळे बाजार समिती बंद असल्याने आर्थिक नुकसान होणार आहे. आठवड्यातून एकदा मिरचीची काढणी करतो, आता ही मिरची स्थानिक बाजारात जाणार नाही.एका तोड्याला साधारण २०० किलो मिरची निघते, काय करावं आणि कसं जगावं, असा प्रश्‍न असल्याचे खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी  बापू शेळके यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com