राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन होणार

महाराष्ट्रानेच देशाला पाणी वापर सोसायट्यांची संकल्पना आणि एक सक्षम कायदा मिळवून दिला आहे. दुर्दैवाने सोसायट्या भरपूर झाल्या पण त्या केवळ कागदावर राहिल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी यंत्रणेला आत्मपरीक्षण करावे लागेल. जगभर चालते तसे कालबद्ध मूल्यमापन करीत कामकाजात सातत्याने बदल घडवून आणावे लागतील. - एस. ए. कुलकर्णी, माजी सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात नव्याने ५ हजार ८२० पाणी वापर संस्था सोसायट्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याद्वारे संस्थांच्या लाभक्षेत्राखाली किमान २९ लाख ३८ हजार शेतजमिनी ओलिताखाली येणार आहे.

“पाणी वापर सोसायट्यांच्या स्थापनेसाठी अत्यावश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास सोसायट्यांच्या लाभक्षेत्राखाली किमान २९ लाख ३८ हजार शेतजमिनी येतील. या सोसायट्या स्थापन झाल्याशिवाय पाण्याचे वाटप सरकारी यंत्रणेकडून शेतकरी वर्गाच्या हातात जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पाणी वापर सोसायट्यांची संकल्पना पुढे नेण्यासाठी मानसिकतेत बदल करावे लागेल, असे मत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे माजी सचिव एस. ए. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. “सिंचन विकासासाठी अत्यावश्यक ठिकाणी खासगी क्षेत्राचीही मदत घ्यावी लागेल. त्याशिवाय ही संकल्पना पुढे जाणार नाही,” असेही श्री.कुलकर्णी यांचे मत आहे. राज्यात सध्या दोन हजार ९५६ पाणी वापर सोसायट्या स्थापन झालेल्या आहेत. या सोसायट्यांच्या अखत्यारीत ११ लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्र येते. तथापि, सरकारी यंत्रणेने मिशन मोडवर काम केल्यास अजून आठ हजार सोसायट्या स्थापन होऊ शकतात. यातून शेतकऱ्यांच्या ताब्यात ३५ लाख हेक्टर लाभक्षेत्र देता येऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी दोन माध्यमातून पाणी वापर सोसायट्या तयार झालेल्या आहेत. यात २००५ च्या महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायद्याच्या अखत्यारीत दोन हजार २८५ सोसायट्या तयार झालेल्या आहेत. तसेच, १९५० च्या सहकार कायद्यान्वये ६७१ संस्था तयार झालेल्या आहेत.

दोन्ही कायद्यानुसार राज्यात तीन हजाराच्या आसपास सोसायट्या तयार झाल्या. मात्र, काही ठिकाणी कामे कागदोपत्रीच सुरू आहे. या सोसायट्या शेतकरीभिमुख करण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे.

“सहकारी कायद्याच्या अखत्यारीत ५५ ठिकाणी केवळ करारनामे होणे बाकी आहे. दोन्ही कायद्यानुसार सोसायट्यांची नोंदणी झाली. मात्र, करारनाम्याची प्रक्रिया झालेली नाही. ही प्रक्रिया झाल्यास दोन हजार ठिकाणी सोसायट्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकते,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com